Delhi Election Result 2025 : आपचा ‘दारू’न पराभव, या पाच कारणांमुळे दिल्ली गेली, या चुका पडल्या महागात
Delhi Election Result 2025 : दिल्लीत लीकर घोटाळ्याचे भूत समोर आल्यानंतर आपचा आत्मविश्वास लीक झाला. त्याचा परिणाम दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मधील निकालात आपचा 'दारू'न पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीत लिकर घोटाळ्याचे भूत भाजपाने चांगलेच नाचवले. इतकेच नाही तर त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतरा व्हावे लागले. इतर प्रमुख सहकारी अगोदरच तुरूंगात असल्याने आतिषीच्या हाती प्रमुख पदाची सूत्र द्यावी लागली. अखेरच्या वर्षभरात आपला अंतर्गत विषयातच गुरुफटून ठेवण्यात भाजपा यशस्वी ठरल्याचे दिसून येते. या आणि इतर काही फॅक्टरमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मधील निकालात आपचा ‘दारू’न पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
लिकर घोटाळा, मतदानाला गळती
दिल्लीमधील दारू घोटाळ्यात आप सरकार बुडाले म्हटले तर वावगे ठरणार नाही. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या भोवती दारू घोटाळ्याचा फास आवळला. त्यात ईडी पासून इतर तपास यंत्रणांची एंट्री झाली. आपचे अनेक दिग्गज तुरुंगात गेले. त्यात अरविंद केजरीवाल यांचा पण क्रमांक लागला. दिल्ली निवडणुकीचा बिगुल वाजताच केजरीवाल आणि सिसोदिया यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली.




या सर्व घोटाळ्याचे मुद्दे निवडणुकीत प्रभावीपणे वापरण्यात भाजपा यशस्वी ठरली. लिकर घोटाळ्यापासून अनेक घोटाळ्याचा मुद्दा निवडणुकीत हिरारीने मांडण्यात आला. त्यात केजरीवाल यांच्या मोफत वाटपाच्या सर्व योजना एका झटक्यात मतदारांनी मागे टाकल्या.
आतिषी छाप पाडण्यात कमी
लिकर घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर अरविंद केजरीवाल पायउतार झाले. त्यानंतर आतिषी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली. पण आतिषी यांना करिष्मा दाखवता आला नाही. केजरीवाल यांच्या पत्नीचे नाव समोर आले असतानाही आतिषी यांना आपने पुढे आणले. आम्ही घराणेशाही मानत नाही असा संदेश देण्यात आप यशस्वी ठरले. पण आतिषींना लोकप्रिय निर्णय घेता आले नाही. मुख्यमंत्री दुबळा दिसला. मुख्यमंत्री म्हणून आतिषी यांनी छाप पाडलीच नाही.
INDIA आघाडी प्रचारात कुठेच नाही
इंडिया आघाडीतील फूट, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी आपला पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणुकीत आपच्या प्रचाराला यातील कोणताही दिग्गज आला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचंच मतदारांसमोर गेलं. केजरीवाल यांच्या पाठीशी इंडिया आघाडीतील नेते आहेत हे दिसलंच नाही. तर काँग्रेससोबत केजरीवाल यांनी आघाडीन केल्याचा फटका सुद्धा आपला दिसून आले. भलेही काँग्रेसला निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही. पण काँग्रेसची मतं आपला मिळाली असती, तर चित्र वेगळं दिसलं असतं.
अण्णा फॅक्टर चालला
समाजसेवक अण्णा हजारे यांनी 15-18 वर्षांपूर्वी दिल्लीत भ्रष्टाचाराविरोधात दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. त्यातून देशात सत्ता पालट झाली. काँग्रेस सत्तेतून गेली. भाजपाने मांड ठोकली. दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यावेळी अण्णा उतरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच त्यांनी बोट ठेवलं. केजरीवाल स्वार्थी, बदमाश आणि संधीसाधू असल्याची प्रतिमा ठसवण्यात अण्णा यशस्वी ठरले.
भाजपाची जमेची बाजू
भाजपचं सुक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले. दिल्लीत ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन मतदारांना आकर्षित केलं. मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी, तर आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं. प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच केलं नाही, यामळे आपला फटका बसला.
हा तर महाराष्ट्र पॅटर्न
दिल्लीत आप सत्तेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. जनता भाजपाला मतदान करत नसल्याचे ते म्हणाले. मतदान घोटाळ्याचा महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत राबवल्याचा आरोप त्यांनी केला.