भारताच्या काही जमिनींवर त्यांची नजर… चीन भारतात घुसला? विरोधकांच्या आरोपानंतर सरकारचे थेट उत्तर
China-Arunachal Pradesh: सीमावर्ती राज्यातील अनेक गावातील रहिवाशांनी चिंता व्यक्त करणे सहाजिक असल्याचे कॅबिनेट मंत्री किरेन रिजीजू म्हणाले. तर विरोधकांनी, चीन भारताच्या हद्दीत घुसल्याचा जो दावा केला आहे, त्यावरही रिजीजू यांनी मौन सोडले आहे.

अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात चीन आत घुसल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा दावा कॅबिनेट मंत्री किरेन रिजीजू यांनी सपशेल खोटा असल्याचे म्हटले. जे लोक चीन भारतीय भूमीत 60 किमी आत घुसल्याचा दावा करत आहेत, ते आम्हाला बदनाम करण्यासाठी विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पण हे सर्व तथ्यहीन आहे. या दाव्यात काहीच दम नसल्याचे रिजीजू म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची चिंता सहाजिक आहे. कारण अनेक ठिकाणी सीमा निश्चितीबाबत निर्णय झालेला नाही.
काही जमिनींवर त्यांची नजर, कारण सीमा निश्चित नाहीत
भारतीय जमिनींवर त्यांची नजर आहे. पण याचा अर्थ असा नाही की चीनने भारतीय वस्त्या, गावं ताब्यात घेतली. अनेक ठिकाणी सीमा निश्चित नसल्याने चीन त्या भागावर त्यांचा दावा करत आहे. पण याचा अर्थ असा कसा होईल की, चीन थेट आपल्या हद्दीत येईल आणि गावांवर कब्जा सांगेल? केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री रिजीजू यांनी याविषयी संयत आणि आणि स्पष्ट भूमिका जाहीर केली.
आपला भूभाग समोरपर्यंत आहे. तर तिबेटमधील काही गावातील लोकांचा दावा आहे की त्यांची शेती दूरपर्यंत आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. पण त्यावरून चीन भारतात 60 किलोमीटर आत घुसला हा दावा करणे चुकीचे असल्याचे रिजीजू म्हणाले. बांगलादेशाच्या सीमावर्ती भागातही असाच दावा करण्यात येतो. असेच फोटो शेअर करण्यात येतात. ही सर्व माहिती साफ खोटी आहे. वास्तविकतेशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. चीन भारतात 60 किलोमीटर आत घुसल्याची चुकीची माहिती दिल्याने तिथल्या भारतीय सैनिकांच्या मनोबलावर परिणाम होत असल्याचे रिजीजू म्हणाले. देशातही या चुकीच्या माहितीमुळे संभ्रम तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला.
सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत
भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. भारत आणि तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) अरूणाचल प्रदेश आणि इतर सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आल्याचे रिजीजू म्हणाले. केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणं आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आता सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशात त्यांच्या प्रमाणित नावांनी ओळखण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणांवर चीनचा दावा आणि त्यांची नावं वारंवार बदल करण्याच्या चीनच्या कृतीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि चीनने दोन्ही देशातील संबंध टिकवण्यासाठी नियंत्रण रेषेवर सहकार्य आणि शांतता ठेवणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
