नेपाळमध्ये महापुराने महाविध्वंस, भारतातील या राज्याला तातडीचा हाय अलर्ट; प्रशासन लागले कामाला!
बिहारला लागून असलेल्या नेपाळमध्ये महापूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले असून हजारो लोकांवर याचा परिणाम झाला आहे. नेपाळमध्ये पुराची परिस्थिती गंभीर होत असताना त्याचा परिणाम बिहारवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहारमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बिहारला लागून असलेल्या नेपाळमध्ये महापूर आला आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले असून हजारो लोकांवर याचा परिणाम झाला आहे. नेपाळमध्ये पुराची परिस्थिती गंभीर होत असताना त्याचा परिणाम बिहारवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन बिहारमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रशासन लागले कामाला
संभाव्य पुराच्या पार्श्वभुमीवर बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पूरस्थिती आणि संभाव्य धोक्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी (DM) तसेच पोलीस अधीक्षक सहभागी झाले होते. नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा?
गंडक नदीशी संबंधित जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे. बेतिया, मोतिहारी, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली या जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय सीतामढी, शिवहर तसेच इतर संवेदनशील जिल्ह्यांमधील परिस्थितीवरही सातत्याने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नद्यांची पाणीपातळी, सखल भाग, पूल-पुलिया आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना संभाव्य धोक्याची माहिती वेळेवर देऊन सतर्क करण्यासही सांगण्यात आले आहे. या पुरामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. असं असलं तरी या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नेपाळमधील रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा, लमजुंग आणि तनहुँ तसेच दोलखा आणि सिंधुपालचोक या भागांमध्ये अचानक पूर येण्याचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्याचवेळी कोसी, बागमती आणि गंडक कॅचमेंट मधील इतर अनेक भागांमध्येही मध्यम स्वरूपाचा पूर येण्याचा धोका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
