‘ती तर आपलीच मूलं, पण Gen Z ची दिशाभूल केली…’, NEET वादानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे भाष्य
Dharmendra Pradhan on NEET Protest: नीट पेपरफुटी, जंतरमंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन, लाठीहल्ला आणि त्यानंतर राजीनामा, या सर्व घडामोडीनंतर आता माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.

माजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET पेपरफुटीनंतरचा वाद आणि राजीनाम्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ओडिसामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी त्यांनी एका कार्यक्रमात संवाद साधला. Gen Z आपलीच मुलं आहेत. पण त्यांची काही लोकांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्रिपद ही काही त्यांच्यासाठी प्राथमिकता नव्हती. 20 जुलै रोजी जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. पेलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. देशभरात विद्यार्थी आंदोलन लोण पोहचले. प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याची घोषणा त्यांनी एक्स हँडलवरून केली होती. आता याविषयावर त्यांनी मनमोकळं केलं आहे.
Gen Z आपलीच मुलं, त्यांची दिशाभूल करण्यात आली
देशात प्रत्येक वर्षी जवळपास दोन कोटी मुलं जन्माला येतात. गेल्या एका दशकात जवळपास 20 कोटी मुलं या देशाचा भाग होतात. या तरुणाईच्या काही अपेक्षा आहेत. ही पिढी भविष्यात भारताला विश्वगुरू होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रधान म्हणाले. NEET पेपरफुटी आणि परीक्षा वाद, जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत काही लोकांनी तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. मंत्रिपद त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. अथवा त्यासंबंधीची कोणतीही अडचणही नव्हती असा खुलासा त्यांनी केला.
राजीनाम्यावर काय म्हणाले प्रधान?
त्यांनी राजीनाम्याच्या घडामोडींवर प्रकाश टाकला. आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला आणि पदावरून दूर जाण्याचा निर्णय त्यांनी कळवला.नीट परीक्षेवरून वाद सुरू होता. विद्यार्थी आंदोलन करत होते. सरकारच्या भूमिकेवर सातत्याने सवाल करण्यात येत होते. पण स्पष्टपणे सांगतो की, माझ्या पदापेक्षा देश आणि तरुण हा महत्त्वाचा आहे. ते भारताचे भविष्य आहे, असे प्रधान म्हणाले. त्यांनी 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मी पुन्हा येईन
भुवनेश्वर येथील रायराखोल येथील कार्यक्रमा दरम्यान प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांच्यावर निशाणा साधला. आपल्याविरोधात बीजेडी कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली, गो बॅकच्या घोषणा दिल्या, त्यामुळे आपण विचलित झालो नसल्याचे प्रधान म्हणाले. मी शेतकर्याचा मुलगा आहे. मला जर कोणी जाण्यास सांगितले तर मी पुन्हा येईन. पटनायक यांची विधानं ही ओडिसाच्या संस्कृतीला धरून नसून ती अत्यंत लज्जास्पद असल्याचा दावा प्रधान यांनी यावेळी केला. पटनायक यांनीही प्रधान यांच्यावर पलटवार केला आहे.