Amit Shah : ‘गुजरातमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही’, मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनात अमित शाहंचं वक्तव्य
Amit Shah : "विनोबा भावे यांचं स्मरण मी या प्रसंगी करतो. विनोबा भावे म्हणालेले की, मी हिंदीची मदत घेतली नसती तर केरळ, आसाम, काश्मीरपर्यंत गावागावत जाऊन भूदान, ग्रामदानाचा संदेश पोहोचवू शकलो नसतो. मी अन्य भाषांची मदत घेतली असती तर गावागावात काम करु शकलो नसतो. राजभाषेमुळे मी संवाद करु शकलो" असं अमित शाह म्हणाले.

“हिंदी दिवस आणि सहावं अखिल भारतीय राजभाषा संमेलन देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात होतय. मी तुमच्या सर्वांच स्वागत करतो. आजच्या दिवशी देशभरातल्या राजभाषा प्रेमींना हिंदी दिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो. मित्रांनो, आजपासून गणेशोत्सव सुरु होतोय. गणपती बाप्पांच आगमन झालय. निश्चितपणे मणीकंचन योग आहे. हिंदी दिवस आणि गणपती स्थापना दिवसही आज आहे. मी मानतो की, विघ्नहर्ता भारतीय भाषांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करतील. जी भारतीय भाषांच्या मार्गात विघ्न आहेत, ती विघ्नहर्ता गणेश दूर करतील” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. ते 6 व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात बोलत होते. “महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात 1893 साली लोकमान्य टिळकांनी केली. टिळकांनी या देशाची नस पकडली. या देशाची रचना, संस्कृती याचा इतिहास यात जागृती सांस्कृतिक राष्ट्रवादाने आणली जाऊ शकते. लोकमान्य टिळकांनी दोन गोष्टी सुरु केल्या. एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती” असं अमित शाह म्हणाले.
“या दोन उत्सवाच्या माध्यमातून देशभक्तीचा ज्वर उभं करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं. मित्रांनो, आज इथे गणेशोत्सवाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांना मनापासून प्रणाम करतो” असं अमित शाह म्हणाले. “आज इथे हिंदी भाषा संसाधन, हिंदी टंकन अंशलिपी यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ झालाय. ज्या-ज्या लोकांना राजभाषा किर्ती सन्मान आणि राजभाषा गौरव पुरस्कार मिळालाय त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो” असं अमित शाह म्हणाले.
नरेंद्र मोदी असे पंतप्रधान मिळाले, ज्यांनी..
“वंदे मातरम हे गीत नाही, तर घनघोर गुलामीच्या कालखंडातील भारतीय चेतना जागृत करण्याचा प्रयत्न आहे. या कवितेने भारतीयांची चेतना जागृत करण्याचं काम केलं. हे गीत संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची उदघोषणा बनलं. वंदे मातरमने स्वांतत्र्य प्राप्त करण्याची तीव्र भावना जागृत केली. वंदे मातरम गीताचे तुकडे केलेले. हे गीत पूर्ण स्वरुपात स्वीकारण्यासाठी देशाच्या संसदेला 80 वर्ष लागली. नरेंद्र मोदी असे पंतप्रधान मिळाले, ज्यांनी वंदे मातरमला पूर्ण स्वरुपाचा गौरव मिळवून दिला. ही महान परंपरेची, विशाला विचारांची भूमी आहे” असं अमित शाह म्हणाले.
महाराष्ट्रा इतका बहुभाषी प्रदेश एकही नाही
“ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांनी स्वराज्याची कल्पना केली. स्वराज्याची कल्पना सुस्पष्ट केली. स्वराज्य हे शासनापर्यंत मर्यादीत नाही. स्वधर्म, स्वभाषा या तिघांना स्वराज्याचं मुख्य अंग बनवलं. शासनात मराठीला महत्व दिलं. भाषेचा राजकोष बनवला” असं अमित शाह यांनी सांगितलं. “महाराष्ट्राच्या बहुभाषी संस्कृतीला मी प्रणाम करतो. मराठीचा सन्मान झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्या सोबतच महाराष्ट्राच्या भूमीत कोकणी, गुजराती, हिंदी, सिंधी, वारली या अनेक भाषांचा एकत्र विकास झाला, सन्मान झाला आणि त्या स्वीकारल्याही. महाराष्ट्र या बहुभाषी प्रदेशाइतका एकही प्रदेश या देशात नाही” असं अमित शाह म्हणाले.
गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते
“मी तु्म्हाला गौरवाने सांगू इच्छितो की, मी गुजरातमधून येतो. गुजरातमध्ये हिंदी भाषा बोलली जात नाही. गुजराती भाषा बोलली जाते. मला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची माझ्या पक्षाने जबाबदारी दिली. त्यावेळी मला काम करण्यात अडचण आली नाही, कारण मला हिंदी समजत होती आणि मी बोलू शकत होतो” असं अमित शाह म्हणाले. “महाराष्ट्र ही वीर सावरकरांची सुद्धा भूमी आहे. वीर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक असण्याबरोबरच विद्धवान भाषा शास्त्री सुद्धा होते. त्यांनी अशा शब्दांची रचना केली की ते शब्द भारतीय भाषेत उपलब्ध नव्हते. त्यांनी मराठी भाषेच्या शुद्धीकरणाचं काम केलं. आम्हाला भारतातली प्रत्येक भाषा समृद्ध करायची आहे” असं अमित शाह म्हणाले.
