विमानतळांना धमकीचा ईमेल, चौकशीत काहीही संशयास्पद आढळलं नाही
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या नोएडा फीडबॅक ईमेलवर ‘dawood@gmail.com’ वरून काल एक धमकीचा संदेश आला. त्यात भारतीय विमानतळांवर २४ तास दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, त्रिवेंद्रम येथे हल्ला केला जाईल असं लिहिलं होतं. तात्काळ कारवाई म्हणून, मुंबई विमानतळावर सुरक्षा एजन्सींची बैठक बोलावण्यात आली. या धमकीच्या ईमेलच्या चौकशीत काहीही संशयास्पद आढळलेलं नाही. सूत्रांनी सांगितलं की, मुंबई विमानतळ परिसरात बीडीडीएसने केलेल्या व्यापक दहशतवादविरोधी आणि सुरक्षा तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळली नाही. हे प्रकरण गांभीर्याने घेत, सर्व प्रमुख विमानतळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे आणि सुरक्षा तपासणी सुरू आहे.
काल, देशातील 5 विमानतळ बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकीचा मेल आला. इंडिगो एअरलाइन्सला बुधवारी दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्ली बॉम्बस्फोटाचे प्रकरण ताजे असल्यामुळे देशातील 5 विमानतळ स्फोटामध्ये उडवून देण्याच्या धमकीने एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर सविस्तर चौकशी सुरू झाली. हा मेल कुणी आणि कुठून पाठवला याचा तपास करण्यात आला.
एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने काय म्हटलं?
‘वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानाला धमकी मिळाली होती. यानंतर आम्ही सरकारने नियुक्त केलेल्या बॉम्ब धोक्याचे मूल्यांकन करणाऱ्या समितीला तात्काळ माहिती दिली. तसेच सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात आल्या. विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. आता सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतर विमान उड्डाणासाठी सोडण्यात येईल’ असं एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने म्हटलं होतं.
देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळांच्या आत आणि बाहेर सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस कर्मचारी तैनात आहेत. श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकांनाही सज्ज ठेवण्यात आलं आहे. कोणताही धोका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
