
अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजवाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. हा मार्ग जगातील सुमारे 20 टक्के कच्च्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांशी संपर्क साधून या जलमार्गाच्या सुरक्षेसाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. मात्र यातील अनेक देशांनी युद्धनौका पाठवण्यास विरोध केला आहे. अशातच आता भारत या भागात युद्धनौका पाठवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता याबाबत सरकारने आपली भूमिका जाहीर केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे. यात चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम यांच्यासह अनेक देशांचा समावेश होता. यातील काही देशांनी युद्धनौका पाठवण्यास नकार दिला आहे. यानंतर आता भारतानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धनौका तैनात करण्यासाठी अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा करत आहे का? या प्रश्नावर बोलताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ‘भारत अशी कोणतीही तैनाती करण्याचा विचार करत नाही.’ असं स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.
होर्मुजमध्ये युद्धनौका पाठवण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘या विषयावर अनेक देशांशी चर्चा सुरू आहे, मात्र भारत आणि अमेरिका यांच्यात याबाबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. भारत या विषयावर विविध हितधारकांशी संवाद सुरू ठेवेल.’ भारताच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.
दुसरीकडे भारत आणि इराण यांच्यातील संबंध भूतकाळापासून चांगले आहेत. भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी, ‘भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना होर्मुजमधून सुरक्षितपणे जाण्यासाठी इराणसोबत चर्चा सुरू आहे. यातून सकारात्मक परिणाम मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर भारताची दोन एलपीजी वाहक जहाजे शिवालिक आणि नंदा देवी यांनी सुरक्षितपणे होर्मुजची सामुद्रधुनी पार केली होती.