जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!
सीजेपीचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सीजेपीच्या तसेच आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, याची सविस्तर माहिती दिली. तसेच एक पत्र देऊन केंद्र सरकारकडे मागण्या केरल्या.

Delhi Jantar Mantar Protest : दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून मोठे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनात सामील होण्यासाठी देशभरातील तरुण दिल्लीत पोहोचले आहेत. हजारो संतप्त तरुणांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीत जमलेले हजारो तरुण संसदेवर जाऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे सीजेपच्या प्रतिनिधींनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेऊन आपल्या मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता सरकारने सीजेपीच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला आहे. सरकारने आंदोलकांना पहिले मोठे आश्वासन दिले आहे.
बैठकीत नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार सीजेपीचे प्रमुख प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी सीजेपीच्या तसेच आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, याची सविस्तर माहिती दिली. सीजेपीतर्फे एक पत्र देऊन केंद्र सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षेतील गैरव्यवहारामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या सीजेपीतर्फे करण्यात आल्या आहेत. याच मागण्यांवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कोणावरही गुन्हा दाखल केला जाणार नाही
सीजेपीचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्च केला. ही निषेधार्ह बाब आहे, असेही सीजेपीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. यावर तुमच्या मागण्यांवर सरकार विचार करेल, असे नड्डा यांच्यातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच आंदोलकांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, असे आश्वासन नड्डा यांनी सीजेपीला दिलेले आहे. त्यामुळे सीजेपीने केलेल्या आंदोलनाची सरकारने दखल घेतल्याचे समजले जात आहे.
पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
दरम्यान, दुसरीकडे काहीही झालं तरी आमचे आंदोलन सुरूच राहील. आम्हाला शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांची आहे. तर हे आंदोलन संपवण्यासाठी पोलीस आंदोलकांची धरपकड करत आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाचे भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
