Kangana Ranaut : कंगना राणावतचं भाजपला धक्का देणारं विधान, थेट म्हणाली, मी काही भाजपची…
कंगना राणावतने भाजपबाबत धक्कादायक विधान केले आहे. ती म्हणाली, "मी भाजपची कठपुतळी नाही." आपले स्वतंत्र अस्तित्व आणि विचारधारा असून, भविष्यात लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तरी फरक पडणार नाही. खासदार असण्यापूर्वी २० वर्षे कलाकार म्हणून ओळख होती, त्यामुळे अभिनयात आणि चित्रपट निर्मितीत करण्यासारखे बरेच काही आहे, असे सांगत तिने पक्षावर अवलंबून नसल्याचे स्पष्ट केले.

अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणावतने थेट भाजपलाच धक्का देणारं विधान केलं आहे. मी काही भाजपची कठपुतळी नाहीये. कदाचित उद्या पक्ष माझी साथ देणार नाही. माझ्या बाजूने उभा राहणार नाही, असं सांगतानाच उद्या मला लोकसभेचं तिकिट नाही मिळालं तर काही फरक पडत नाही. करण्यासारखं बरंच काही आहे. मी आजही अनेक दिग्दर्शकांची आवडती अभिनेत्री आहे, असं बिनधास्त आणि रोखठोक विधान कंगना राणावतने केलं आहे.
कंगना राणावतने डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आपली मते बिनधास्त मांडली. तुम्ही जी काही विधानं करता ती भाजपची अधिकृत मते असतात का? असा सवाल कंगनाला करण्यात आला. त्यावर तिने थेट आक्रमक भूमिकाच मांडली. असं नाही की मी पक्षाच्या भूमिकेपासून दूर जातेय. पण मला वाटतं जेव्हा आजूबाजूला मोठा गदारोळ उठतो, तेव्हा तुम्हाला ओरडण्याची गरज असते. मी अनेकदा रोखठोक आणि बिनधास्त बोलते. पण मी जाणूनबुजून असं करत नाही. त्यामुळे एवढं लक्षात घ्या… मी काही पपेट नाहीये. भाजप आज माझ्यासोबत आहे, उद्या असेल, नसेल. मी गेल्या दोन वर्षापासून संसदेची सदस्य आहे. 20 वर्षापासून मी कलाकार आहे. माझं स्वत:चं अस्तित्व आहे. जर मी उभी राहिली तर 20 मीडियावाले येतील आणि माझं म्हणणं ऐकतील, असं कंगना राणावत म्हणाली.
थोडं बहूत इकडे तिकडे
मी नेहमीच आजही स्वत:ला व्यक्तिगतरित्या वेगळं समजत नाही. माझे विचार हे माझे आहेत. माझी विचारधाराही माझी वैयक्तिक आहे. ती अचानक गायब होणार नाही. पक्षासोबत माझी अलाईन्मेंट चांगली आहे. मला पूट ऑन करण्याची गरज भासत नाही. हे मात्र खरंय की कधी कधी इकडे तिकडे होतं. त्यांना माझं म्हणणं खटकत असावं. पण मी अजून नवीन आहे आणि या गोष्टी समजून घेत आहे. शिकत आहे, असंही कंगनाने स्पष्ट केलं.
तिकीट नाही मिळालं तर नाही…
येत्या 5-10 वर्षात तू कोणत्या मोठ्या संवैधानिक पदावर असशील? की परत अभिनयाकडे मोर्चा वळवणार? असा सवाल कंगनाला करण्यता आला. त्यावर, याचं उत्तर देणं कठिण आहे. आजच्या काळात जेवढी अनिश्चितता आहे, हे पाहता काहीच सांगता येत नाही, असं तिने सांगितलं. पुढच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळण्याची भीती वाटतेय? असं तिला विचारण्यात आलं. त्यावर, याला भीती म्हणता येत नाही. तिकीट नाही मिळालं म्हणजे माझं अस्तित्व संपुष्टात येईल ही भीती म्हणता येणार नाही. मी एक अभिनेत्री आहे. फिल्ममेकर आहे. लेखिका आहे. माझं माझ्या कामावर प्रेम आहे. मी अनेक दिग्दर्शकांची आवडती नटी आहे. त्यातील अनेकजण माझी वाटही पाहत आहेत. तू इंडस्ट्री का सोडली? असं ते मला विचारत असतात. आयुष्यात करण्यासारखं बरंच काही आहे, असं तिने स्पष्ट केलं.
कॉकरोचची पप्पी तर नाही घेणार ना?
यावेळी तिने कॉकरोच जनता पार्टीचं नाव न घेता टीका केली. कॉकरोचला तुम्ही चप्पलनेच माराल. हातात तर घेणार नाही. कॉकरोचची पप्पी तर घेणार नाही ना? असं कंगना म्हणाली.
