
मध्य पूर्वेतील युद्दाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. जहाजांची वाहतूक विस्कळित झाल्यामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही लोक घरात सिलिंडरचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांचा हा निर्णय केवळ धोकादायक नाही तर नियमबाह्य देखील आहे. सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी कनेक्शन आणि सिलेंडर ठेवण्याबाबत कडक नियम केले आहेत. हे नियम मोडल्यास संबंधित व्यक्तीला तुरुंगवास देखील होऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारतात एलपीजी कनेक्शनबाबत वन हाउस, वन कनेक्शन हा नियम लागू आहे. एका घरात फक्त एकच एलपीजी कनेक्शन वैध मानले जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची इंडेन गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची एचपी गॅस आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची भारत गॅस या कंपन्यांतर्फे ग्राहकांना कनेक्शन दिले जाते. जर एखाद्या ग्राहकाकडे आधीच एखाद्या कंपनीचे कनेक्शन असेल, तर त्याच पत्त्यावर दुसऱ्या कंपनीचे कनेक्शन घेणे नियमांच्या विरोधात मानले जाते. मात्र ग्राहकांना एकाच कंपनीचे डबल सिलेंडर कनेक्शन मिळू शकते. यात एका कनेक्शनवर दोन सिलिंडर मिळतात.
नियमानुसार, घरगुती ग्राहकांसाठी एका कनेक्शनवर दोन सिलेंडर ठेवणे सामान्य मानले जाते. त्यापैकी एक सिलेंडर वापरात असतो, तर दुसरा राखीव म्हणून ठेवला जाऊ शकतो. तसेच एक ग्राहक वर्षभरात जास्तीत जास्त 15 घरगुती सिलिंडर घेऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने वैध परवानगीशिवाय गरजेपेक्षा जास्त सिलेंडर किंवा 40 किलोग्रामपेक्षा जास्त एलपीजीचा साठा केल्यात प्रशासन कारवाई करू शकते.
मर्यादेपेक्षा जास्त गॅस सिलिंडर घरात ठेवल्यास कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. जर एखाद्याकडे बेकायदेशीरपणे सिलेंडर ठेवलेले आढळले किंवा काळाबाजाराचा प्रकार समोर आला, तर त्याचे गॅस कनेक्शन रद्द केले जाऊ शकते आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये हा गुन्हा अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत मानला जातो. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 3 महिन्यांपासून ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे घरी सिलिंडरचा साठा टाळावा.