40000 पोलीस मागे, साडेपाच कोटींचे बक्षीस, पत्नीच्या प्रेमावर नाही तर… माओवादी सोनू दादाची Exclusive मुलाखत
गडचिरोलीच्या माओवादी चळवळीचा सर्वात मोठा चेहरा असलेल्या सोनू दादा यांनी टीव्ही ९ मराठीला Exclusive मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

गडचिरोलीच्या माओवादी चळवळीचा सर्वात मोठा चेहरा म्हणून मल्लोजी वेणू गोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू दादा ओळखले जातात. त्यांनी जवळापास 42 वर्ष माओवादी चळवळीचे नेतृत्व केले. ते उच्चशिक्षित माओवादी आहेत. त्यांना पकडण्यासाठी सात राज्याच्या जवळपास 40 हजार पोलिसांनी वेगवेगळे ऑपरेशन चालविले होते. ते माओवादी चळवळीचे सेंट्रल कमिटी सदस्य होते. त्यांच्यावर सात राज्यांमध्ये एकूण साडेपाच कोटींचे बक्षीस होते. नुकताच मल्लोजी वेणू गोपाल यांनी टीव्ही ९ मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
प्रवास कसा सुरु झाला?
सोनू दादा यांनी माओवादी चळवळीत कसा सहभाग घेतला, त्यांचा सुरुवातीचा काळ कसा होता याविषयी सांगितले आहे. ते म्हणाले, “माझ्या वयाच्या सुरुवातीला १९७०मध्ये सामाजिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होते. त्याच्या विरोधात नक्षलवादी माओवादी संघटनेत मी प्रवेश केला होता. मी एक साधारण कार्यकर्ता म्हणून माओवादी चळवळीत प्रवेश केला. त्यानंतर डिव्हिजनल कमिटी मेंबरची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. त्यानंतर राज्य कमिटी मेंबर म्हणून माझी नियुक्ती झाली आणि 28 वर्ष अगोदर माओवादी सेंट्रल कमिटी मेंबर म्हणून माझी निवड माओवादी सीपीआय संघटनेने केली. आम्ही माओवादी चळवळीच्या प्रचार केला. त्यानंतर हजारोच्या संख्येत युवक माओवादी चळवळी सहभागी झाले.”
पुढे ते म्हणाले, “आजच्या स्थितीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. तशी परिस्थिती आता नाही. ज्या व्यक्तींना समजले की हा युद्ध होऊ शकत नाही. त्यांनी जंगलातून बाहेर पडून आत्म समर्पण केले आणि आता शंभर ते दीडशे माओवादी उरलेले आहेत. जे माओवादी जंगल भागात आहेत त्यांनी आत्मसमर्पण करावे. मी जवळपास 42 ते 44 वर्ष क्रांतिकारी म्हणून जंगल भागात होतो. परंतु परिस्थितीप्रमाणे माणसाला बदलण्याची गरज आहे व त्यात बदलाव न झाल्यास आम्ही जंगलात जीवंत राहू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या साथीदारासोबत जंगलातून बाहेर पडलो आणि जे सध्या नक्षल चळवळीत आहेत त्यांनाही मी बाहेर पडण्याचे आवाहन करीत आहे. मी आत्मसमर्पण करून चांगला निर्णय घेतला असे माझ्या अनेक जुने मित्र माओवादी संघटनेतील लोकांनी म्हटलं.”
पत्नीच्या प्रेमाखातर जंगलातून बाहेर आले का?
या मुलाखतीमध्ये सोनू दादा यांना पत्नीच्या प्रेमाने जंगलातून तुम्हाला बाहेर आणले का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, “माझ्या धर्मपत्नीच्या प्रेमावर नाही तर मी राजकीय पॉलिटिकलला घेऊन जंगलातून बाहेर पडलो. गडचिरोली जिल्ह्यातून मी नक्षलवादी माओवादी चळवळीला सुरुवात केली. म्हणूनच मी आत्मसमर्पण करण्यासाठी गडचिरोली जिल्हा निवडला. गडचिरोली जिल्ह्यात मी नक्षल चळवळीला 1983च्या वर्षी जिल्ह्यात प्रवेश केला होता. संविधान स्वीकारल्यानंतर माझी लढाई संविधानाच्या माध्यमांनी सुरूच राहणारी.
