Ahmedabad plane crash : 18 दिवसांपूर्वी आई, पाठोपाठ वडीलही गमावले… विमान अपघाताने चिमुकलींचं छत्र हिरावलं !
अहमदाबाद येथे गुरूवारी झालेल्या भीषण विमान अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यापैकी एक असलेल्या अर्जुन यांनी अवघ्या 18 दिवसांपूर्वीच आपली पत्नी गमावली. तिच्या अस्थीविसर्जनासाठी तो भारतात आला होता, लंडनला परत जात असतानाच काळाने त्यालाही गाठलं.

गुरूवारी, 12 जूनचा दिवस अत्यंत हादरवणारा होता, गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. प्रत्येक अपघातग्रस्ताची अतिशय दुःखद कहाणी असते. या अपघातात कोणाच्या तरी हृदयाचा तुकडा हरवला. कोणी मुलगा गमावला तर कोणी आईवडील, विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्यापैकीच एक म्हणजे 37 वर्षांचा अर्जुन पटोलिया. लंडनमध्ये कुटुंबासह राहणाऱ्या अर्जुनची कहाणी अतिशय हृदयद्रावक आहे. 18 दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचे भारती पटोलिया यांचे निधन झाले होते, त्यानंतर ते आपल्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते आणि एअर इंडिया 171 मधून लंडनला परत जात असतानाच विमान अपघातामुळे अर्जुन यांचाही मृत्यू झाला.
भारती आणि अर्जुन यांना दोन छोट्या लेकी आहेत. आईला गमावल्यानंतर त्या त्यांच्या वडिलांनी परत येण्याची वाट पहात होत्या, मात्र आता आईप्रमाणेच आपले वडीलही परत कधीच दिसणार नाहीत, याची त्या चिमुकल्या जीवांना कल्पनाच नाही. अर्जुनची मोठी मुलगी 8 वर्षांची तर दुसरी अवघ्या 4 वर्षांची आहे. त्या निरागस, निष्पाप मुलींनी अवघ्या 18 दिवसांपूर्वी त्यांची आई गमावली, आणि त्या आघातातून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांच्या डोक्यावरून पित्याचं छत्रही उडालं. 18 दिवसांतच, मुलींवर दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोन्ही मुली अनाथ झाल्या.
28 मेला झाला पत्नीचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनची पत्नी भारती, ही कर्करोगाने ग्रस्त होती, तिचे 28 मे रोजी निधन झाले. अर्जुन त्याच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आला होता. मृत्यूनंतर आपले सर्व विधी गुजरातमध्ये व्हावेत अशी भारतीची इच्छा होती.त्यासाठी अर्जुन यांनी वडोदऱ्यापासून 60 किमी अंतरावर असलेल्या पोईचा येथील नीलकंठ धाम येथे आणि अमरेलीतील वाडिया या त्यांच्या मूळ गावी भारतीच्या अस्थींचे नर्मदा नदीत विसर्जन केले. यानंतर ते लंडनला परत जाणार होते.
दोन्ही मुली लंडनमध्येच
अर्जुनची आई सुरतमध्ये राहते आणि त्याच्या दोन लहान मुली लंडनमध्ये आहेत. अर्जुनचा धाकटा भाऊ गोपाळ, सध्या मुलींची घेत आहे, तो देखील लंडनमध्ये राहतो. गेल्या रविवारी, पटोलिया कुटुंब भारतीच्या अंत्यसंस्कारासाठी जमले होते. तो अतिशय भावूक करणारा क्षण होता. भारतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते कुटुंब अजूनही सावरलं नव्हतं, तेवढ्यातच त्यांच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचा, अर्जुनचा मृत्यू झाल्याने सगळेच हादरलेत.
अर्जुनचेही विधी करावे लागतील असं कधीच…
माझ्या वहिनीची इच्छा होती की त्यांच्यावर भारतात अंत्यसंस्कार करायचे होते. आम्हाला कधीच वाटले नव्हते की काही दिवसांत आम्ही अर्जुनवरही अंत्यसंस्कार करू” अशा शब्दांता साश्रूनयनांनी अर्जुनच्या चुलत भावाने,संजयने भावना व्यक्त केल्या. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी अर्जुनच्या आईने तिचा डीएनए नमुना दिला आहे. जेणेकरून त्याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वाडिया येथे आणता येईल. 1990 मध्ये अर्जुनने अगदी लहान वयातच त्याचे वडील गमावले आणि त्याचे संगोपन त्याच्या आईने केले.
17 वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्य
अर्जुन वयाच्या 20 व्या वर्षीच युकेला गेला. त्याआधी त्याने सुरतमधील स्वामीनारायण गुरुकुलमध्ये 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. तो गेल्या 17 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होता. तो तिथे फर्निचरचे दुकान चालवत असे. तिथे त्याची भेट भारतीशी झाली, जी अकाउंटंट म्हणून काम करत होती. दोघांचे लग्न झाले आणि त्यांना दोन गोड मुलीही आहेत. आधी आई गेली , तिच्यापाठोपाठ अपघाता वडिलांनाही गमावल्यामुळे त्या दोन्ही मुलींच्या डोक्यावरचं मायेचं छत्रच हरपलं आहे.