IMD Monson Update : तीव्र उष्णता… पण पाऊस कमी की जास्त? हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने चिंता वाढली

IMD forecast on Monsoon : भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशातील कोणत्या भागात किती पाऊस पडणार ते जाणून घेऊयात.

IMD Monson Update : तीव्र उष्णता... पण पाऊस कमी की जास्त? हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने चिंता वाढली
Monsoon Update
Image Credit source: Google
| Updated on: Apr 13, 2026 | 7:00 PM

संपूर्ण भारतात सध्या उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. अनेक राज्यांना उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच आज हवामान विभागाने भारतात मान्सूनबाबत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. यानुसार यंदा देशात पाऊस सरासरीपेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका शेती, पशुपालन आणि जलस्रोतांना बसण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मते जून ते सप्टेंबर दरम्यान एकूण मान्सून पाऊस सुमारे 92% (5% कमी किंवा जास्त) राहू शकतो. हा अंदाज 1971 ते 2020 या कालावधीतील 87 सेमी सरासरीवर आधारित आहे, म्हणजेच पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनवर अल नीनो चा प्रभाव दिसू शकतो, ज्यामुळे तीव्र उष्णता जाणवू शकते आणि कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागाने सांगितले की एप्रिल ते जून 2026 दरम्यान एल नीनो-दक्षिणी दोलन (ENSO) तटस्थ स्थितीत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून हंगामात अल नीनोची तीव्र स्थिती निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे मान्सून कमकुवत राहू शकतो, परिणामी कमी पाऊस पडू शकतो. IMD ने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून दरम्यान परिस्थिती सामान्य राहील, परंतु त्यानंतर मान्सूनदरम्यान अल नीनो सक्रिय होण्याची शक्यता जास्त आहे.

कोणत्या भागात जास्त पाऊस पडणार?

IMD च्या अंदाजानुसार देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच यंदा दक्षिण-पश्चिम मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून मान्सून देशात वेळेवर दाखल होण्याची आहे.

कोणत्या भागात कमी पाऊस पडणार?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या दीर्घकालीन अहवालात कमी पाऊस पडणाऱ्या भागांची यादी दिलेली नाही, मात्र उत्तर भारतातील अनेक भाग आणि गंगेच्या मैदानी प्रदेश आणि आसपासचे पठारी भागात कमी पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागात दुष्काळ पडण्याची शक्यता आहे.

शेतीला फटका बसणार

हवामान विभागाच्या या अंदाजानुसार, देशात कमी पाऊस पडल्यास, शेतीला मोठा फटका बसू शकतो. कमी पावसामुळे पेरणी आणि पीक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होऊ शकतो. कारण भाजीपाला आणि डाळी महाग होऊ शकतात. त्यामुळे लोकांचे बजेट कोलमडू शकते.

Follow Us