मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला असून, राहुल गांधींनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत राहुल गांधींनी आता पंतप्रधानांनी माफी मागावी अशी नवी मागणी केली आहे. मात्र, आंदोलकांच्या आणि सोनम वांगचुक यांच्या मूळ मागण्या वेगळ्या असून मोदींच्या माफीचा त्यात उल्लेख नाही.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत केलेलं आमरण उपोषण पोलिसांनी मोडीत काढलं आहे. त्यामुळे तरुणांचा संताप अनावर झाला आणि या तरुणांनी सोमवार पासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आक्रमक आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. विरोधी पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वत: आंदोलन करून सरकारला घेरलं आहे. मात्र, एकीकडे गोंधळ सुरू असतानाच आंदोलक आणि काँग्रेसमध्ये मागण्यांवरून गोंधळ असल्याचं समोर आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वगळता इतर वेगवेगळ्या मागण्या करून मागण्यांमध्येच गोंधळ असल्याचं समोर आलं आहे.
राहुल गांधींनी आज केंद्र सरकारकडे मागण्या केल्या आहेत. आधी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, नंतर संसदेत चर्चा होणार, ही पहिली मागणी राहुल गांधांनी केली आहे. तर सोनम वांगचुक यांनी सरकारला पत्र लिहून म्हटलंय, की आधी संसदेत सार्थक चर्चा करा आणि नंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याचा सरकारनं विचार करावा.
नवी मागणी काय?
राहुल गांधींनी दुसरी नवी मागणी आज केली. लाठीचार्जवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. तर, सोनम वांगचुक यांनी मोदींच्या माफीची मागणी केली नाही. तर पेपरफुटीनंतर जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधींनी, विद्यार्थ्यांना मारणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करा, अशी तिसरी मागणी केली. तर वांगचुक यांनी म्हटलंय की, आंदोलन आणि मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करु नका.
आंदोलक अनभिज्ञ?
राहुल गांधी यांनी आज तीन मागण्या केल्या. त्यात मोदींनी आंदोलकांची माफी मागावी ही एक नवीन मागणी केली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही मागण्या आपल्या नसून आंदोलकांच्या असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर आंदोलकांच्या मागण्यांमध्ये मोदींच्या माफींचा उल्लेखच नाहीये, त्यामुळे या मागण्यांमध्येच घोळ असल्याचं समोर आलं आहे.
आंदोलकांच्या तीन मागण्या…
वांगचुक यांना रुग्णालयातून शिफ्ट करा
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या
नीटच्या घोळामुळे आत्महत्ये केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटीची मदत करा
राहुल गांधींनी सांगितलेल्या तीन मागण्या
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या
मोदींनी आंदोलकांची माफी मागावी
तसेच सोमवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची जबाबदारी निश्चित करा
वांगचुक यांच्या मागण्या
आधी संसदेत सार्थक चर्चा करा आणि नंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनाम्याचा विचार करा
पेपरफुटीनंतर जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा
आंदोलन आणि मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई नको