पत्रकार परिषदेत महिलांना नो एन्ट्री, अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याचा खळबळजनक खुलासा, केला मोठा दावा
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतक्की हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, त्यांची नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली, मात्र या पत्रकार परिषदेनंतर वातावरण ढवळून निघालं आहे, महिलांना या पत्रकार परिषदेत प्रवेश देण्यात आला नव्हता.

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतक्की हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, त्यांची नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पार पडली, मात्र या पत्रकार परिषदेनंतर भारताचं राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. त्याच कारण देखील तसंच आहे, या पत्रकार परिषदेसाठी महिला पत्रकारांना निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर विरोधी पक्षांकडून सरकारच्या या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुतक्की यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना बॅन केलं नव्हतं असा खुलासा त्यांनी केला आहे, तसेच मी आशा करतो की भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध अधिक मजबूत होतील असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुतक्की?
मुतक्की यांनी यावर बोलताना म्हटलं की आम्ही प्रयत्न करू की भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक मजबूत होतील, आपण सर्वजण एकाच भागातील लोक आहोत, एकमेकांची भाषा आपण बोलू शकतो. आम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना येण्यास मनाई केली नव्हती. आमचा भारतात येण्याचा उद्देश हा भारत सरकारमधील प्रमुख लोकांना भेटण्याचा आहे, भविष्यात भारत आणिअफगाणिस्तानमधील व्यापार आणखी वाढेल, भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध अधिक मजबूत होतील.
महिला पत्रकारांना का बोलावलं नाही?
अमीर खान मुतक्की यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत आधी बैठक पार पडली, या बैठकीनंतर या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतानं या पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारांना एन्ट्री द्यावी असं सूचवलं होतं. मात्र ऐनवेळी तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही यादी बदलली, महिलांना या पत्रकार परिषदेमध्ये न बोलावण्यात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची कोणतीही भूमिका नाही, असं भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महिलांच्या अधिकारांवर बोलणं टाळलं
दरम्यान यावेळी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना अफगाणिस्तानमधील महिलांचे स्वातंत्र्य आणि हक्क याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी या प्रश्नावर बोलणं टाळलं. प्रत्येक देशाच्या काही परंपरा असतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
