लोकसभा निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप, आणखी एक जुना मित्र भाजपसोबत येणार
Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने आपल्या जुन्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी कंबर कसली आहे. अब की बार ४०० पार असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे आता भाजप एनडीएमध्ये जुन्या मित्रांना पुन्हा एकत्र करु लागला आहे.

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आधी इंडिया अलायन्सला एकामागे एक मोठे झटके लागत आहे. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आम आदमी पक्षाने देखील आपण स्वबळावर पंजाबमध्ये निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. मग बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे भाजप आपल्या जुन्या मित्रांना परत एनडीए आघाडीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी भाजपने एक कमिटी देखील स्थापन केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना एनडीएमध्ये सहभागी करुन घेतल्यानंतर आता भाजप मनसेला देखील एनडीएमध्ये आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे.
४ राज्यांमध्ये ४ जुने मित्र
दुसरीकडे आंध्रप्रदेशात भाजपने टीडीपी सोबत बोलणी सुरु केल्याची चर्चा आहे. आंध्रप्रदेशात भाजपला स्वबळावर जागा जिंकणे कठीण आहे. त्यामुळे ते टीडीपी सोबत युती करु शकतात. यूपीमध्ये देखील भाजपने आरएलडीला आपल्यासोबत घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला मोठा झटका लागू शकतो. आता पंजाबच्या राजकारणात देखील भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. कारण भाजपने पुन्हा एकदा अकाली दल पक्षाला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल यांनी आधी पासून युती होती. पण नंतर ती तुटली. पण आता अकाली दल पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतण्याची शक्यता आहे. अकाली दल आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. देशात एप्रिल-मे महिन्यांदरम्यान लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
भाजपचे ४०० जागा जिंकण्याचं टार्गेट
भाजपला लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. भाजपला ३७० तर एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळतील असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप कामाला लागली आहे. पंजाबमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी ते अकाली दलसोबत युती करु शकतात. लवकरच त्याची अधिकृत घोषणा होणार आहे.
अकाली दल एनडीएपासून का वेगळा झाला?
पंजाबमधील शिरोमणी अकाली दल हा 1997 ते सप्टेंबर 2020 पर्यंत भाजपचा जुना मित्र आहे. मात्र, 2020 मध्ये हरसिमरत कौर बादल यांनी तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांनी दोन्ही पक्ष वेगळे झाले. नंतर शेतीविषयक कायदे मागे घेण्यात आले. पंजाब विधानसभेची निवडणूकही दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली होती.
