Pahalgam Attack Anniversary : शहीदांसाठी तीच खरी श्रद्धांजली…; बैसरन व्हॅलीतील नागरिकांचे पंतप्रधान मोदींना पत्र
पहलगाममधील बैसरन व्हॅली दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहिदांच्या स्मृतीप्रत्यर्थ स्मारक उभारले असून, ही व्हॅली पर्यकांसाठी पुन्हा खुली करण्याची मागणी CTI ने केली आहे.

काश्मीरमधील निसर्गरम्य पहलगामजवळील बैसरन व्हॅलीत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज २२ एप्रिल २०२६ रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २२ एप्रिल २०२५ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेच्या पहिल्या स्मृतीदिनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लीडर नदीकाठी उभारले स्मारक
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या २६ पर्यटकांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या पुढाकारातून लीडर नदीच्या काठी एक विशेष स्मारक उभारण्यात आले आहे. अत्यंत साध्या पण भावनिक स्वरूपाच्या या स्मारकावर शहीद झालेल्या सर्व पर्यटकांची नावे कोरण्यात आली आहेत. स्मारक परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच येथे शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे स्मारक केवळ बलिदानाची आठवण नाही, तर देशाची एकता आणि मानवतेचे प्रतीक म्हणून उभे राहिले आहे.
बैसरन व्हॅली आजही बंद; पर्यटनाला फटका
गेल्या वर्षीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखली जाणारी बैसरन व्हॅली पर्यटकांसाठी तात्पुरती बंद केली होती. मात्र, वर्ष उलटूनही ही घाटी अद्याप खुली करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर, विशेषतः हॉटेल आणि पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बैसरन व्हॅली पुन्हा खुली करण्याची मागणी केली आहे. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जावेद बुर्जा यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
CTI ने पत्रात काय म्हटलंय?
पहलगाममधील सुरक्षा परिस्थिती समाधानकारक असेल, तर ही घाटी त्वरित पर्यटकांसाठी खुली करावी. घाटी पुन्हा सुरू करणे हा दहशतवाद्यांना एक चोख प्रत्युत्तर आणि शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. या बंदीमुळे सुमारे ५,००० हून अधिक स्थानिक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. पर्यटन सुरू झाल्याने देशभरात काश्मीरबाबत सकारात्मक संदेश जाईल, असे चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री यांनी म्हटले आहे.