पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, पुन्हा हाय अलर्ट जारी, काश्मीर खोऱ्यात नेमकं काय घडतंय?
पहलगाममधील बैसरन व्हॅलीतील भीषण दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना काश्मीर खोऱ्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून, सुरक्षा दलांनी ड्रोन आणि सर्च ऑपरेशनद्वारे शोधमोहीम तीव्र केली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच सीमावर्ती भागापासून ते पर्यटन स्थळांपर्यंत सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दहशतवादी संघटना एखाद्या मोठ्या घातपाताची योजना आखत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे सर्वच सुरक्षा दल हे कमालीचे सतर्क पाहायला मिळत आहे.
गेल्यावर्षी २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले होते. लष्करी गणवेशात आलेल्या ५ ते ६ दहशतवाद्यांनी हातात एके-४७ आणि अत्याधुनिक एम-४ कार्बाइन घेऊन पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक जखमी झाले. पर्यटनासाठी आलेल्या निष्पाप नागरिकांना लक्ष्य करताना दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या होत्या. या मृतांमध्ये प्रामुख्याने हिंदू पर्यटकांचा समावेश होता. यामध्ये राजस्थान, कर्नाटक आणि इतर राज्यांतील पर्यटकांसह एका स्थानिक मुस्लिम घोडेवाल्याचाही मृत्यू झाला, ज्याने पर्यटकांना वाचवताना स्वत:चे प्राण गमावले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांचा नायनाट
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गेल्या वर्षभरात अनेक दहशतवादी तळांचा नायनाट करण्यात लष्कराला यश आले आहे. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांच्या सततच्या दबावामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना गेल्या वर्षभरात कोणतीही मोठी हालचाल करता आलेली नाही.
हाय-टेक पाळत
या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली आहे. सध्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी घनदाट जंगले आणि डोंगराळ भागात अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला जात आहे. तसेच दहशतवाद्यांच्या संभाव्य लपण्याच्या जागा शोधण्यासाठी लष्कराने जंगलांमध्ये व्यापक सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षा दलांची गस्त वाढवण्यात आली असून, प्रत्येक संशयास्पद वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.
पहलगामसह इतर प्रमुख पर्यटन केंद्रांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र जवानांचा अतिरिक्त वेढा घालण्यात आला आहे. सुरक्षा दलांच्या या कडक भूमिकेमुळे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सीमेपलीकडून होणाऱ्या संभाव्य घुसखोरीच्या इशाऱ्यामुळे जवान सध्या डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत.
