जय हिंद ! हा फोटो पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुगेल; देश संकटात असताना विरोधक-सत्ताधाऱ्यांचा हातात हात!

Operation Sindoor : या फोटोने देशालाच नाही तर पाकिस्तानला ही मोठा इशारा दिला आहे. या फोटोने अनेक संदेश दिले आहेत. देश संकटात असताना आज माध्यमांनी टिपलेला हा फोटो देशभरात व्हायरल झाला आहे.देशात धार्मिक, राजकीय आणि इतर प्रकारे फुट पाडण्याच्या प्रयत्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी केलेली ही राजकीय स्ट्राईक चांगलीच चर्चेत आली आहे.

जय हिंद ! हा फोटो पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुगेल; देश संकटात असताना विरोधक-सत्ताधाऱ्यांचा हातात हात!
राष्ट्रीय एकतेचा थेट संदेश, पाकिस्तानचा जळपळाट
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 08, 2025 | 4:48 PM

देश संकटात असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या या एका फोटोची देशातच नाही तर पाकिस्तान सुद्धा चर्चा सुरू आहे. या फोटोतून अनेक संदेश जगाला गेले आहेत. नरेंद्र मोदी यांचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात आले आहे. आतापर्यंत अनेक मुद्यांवर विरोधक आणि केंद्र सरकारमधील बेबनाव, सूडाचे राजकारण समोर आले. पण पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांच्या भूमिकेने अनेकांची मनं जिंकली. सर्व पक्षीय नेत्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारला एकमताने पाठिंबा दिला. इतकेच नाहीतर केंद्र सरकारच्या कारवाईला आढेवेढे न घेता पाठिंबा जाहीर केला. देश संकटात असताना सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी दाखवलेला सामंजस्यपणा हे नवीन भारताचे सुखद चित्र आहे.

संकटात हम सब एक है

सर्वपक्षीय बैठकीनंतरचा हा फोटो आहे. यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी एकत्र दिसत आहेत. खरगे यांनी राजनाथ सिंह यांचा हातात हात घेतला आहे. त्यांच्यात काहीतरी संवाद सुरू आहे. तर राहुल गांधी या भावस्पर्शी सोहळ्याचे साक्षीदार ठरले आहेत. तर त्यांच्या पाठीमागे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर कोणत्यातरी विषयावर हितगुज करताना दिसत आहेत. या फोटोची आज माध्यमातच नाही तर सोशल मीडियावर पण जोरदार चर्चा आहे.

सर्वपक्षीय एकजूट

पहलगाम हल्ल्यानंतर विरोधकांनी घेतलेली भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या खमक्या भूमिकेला भारतीय विरोधी पक्षांनी एका सुरात पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट दिसून आली. मोदींच्या राष्ट्रहिताच्या आवाहनाला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे.

सर्वपक्षीय बैठकीतून राजकीय एकतेचा संदेश

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. गेल्या दोन दिवसात भारताने सातत्याने पाकिस्तानवर हल्ले चढवले आहेत. आज 12 शहरात 50 ड्रोन हल्ले झाले. तर पाकिस्तानचे हल्ले परतावून लावण्यात आले आहेत. दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून राजकीय एकतेचा संदेश दिला.

सर्वपक्षीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, DMK, BJD, AAP, आणि अन्य प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते.

युद्ध लादले तर मागे हटणार नाही

आज झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत केंद्र सरकारने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची सविस्तर माहिती सर्व पक्षीय नेत्यांना देण्यात आली. भारताला युद्ध नकोय. पण कोणी युद्ध लादत असेल तर भारत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा थेट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिला.

राजकारण करण्याचा काळ नाही

केंद्र सरकारच्या निर्णयाला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला. देश संकटात असताना हा राजकारण करण्याचा काळ नाही. आमच्या सर्व मतभेदांपेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचं आणि मोठं असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या हल्ल्यासंदर्भात सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकतेचं स्वागत केले. देशात धार्मिक, राजकीय आणि इतर प्रकारे फुट पाडण्याच्या प्रयत्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी केलेली ही राजकीय स्ट्राईक चांगलीच चर्चेत आली आहे.

सरकारच्या भूमिकेला पाठिंबा

दरम्यान या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल हे सुद्धा हजर होते. आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलवली होती. आम्ही पक्षाच्या वतीने सामील झालो होतो. भारताच्या सुरक्षेचा विषय आहे. जेव्हा देशाच्या एकतेचा विषय येतो, तेव्हा राजकारण बाजूला ठेवून काम करायचं असते. आज सर्व पक्षीय बैठकीत तशीच भूमिका मांडली. पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवाद पसरवण्यात येत आहे. त्याला संपवण्याची वेळ आली आहे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या धाडसी निर्णयाबद्दल पंतप्रधान आणि लष्कराचे स्वागत केले. सर्व भारतीय पक्ष संकटाच्या काळात एकत्र आहेत हे पाहून अभिमान वाटला. सरकारला जी काही भूमिका घ्यायची त्याला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.