Pahalgam Attack : 26 पर्यटकांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांकडून सेलिब्रेशन, हवेत गोळीबार आणि.. प्रत्यक्षदर्शीने काय काय सांगितलं ?
Pahalgam Terrorist Attack : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये 26 निरपराध, निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यामुळे प्रचंड खळबळ माजली. मात्र या हत्याकांडानंतर दहशतवाद्यांनी जे केलं ते ऐकून तर हृदयाचा थरकाप उडेल. हल्ल्यानंतर तिथे नेमकं काय काय घडलं याचा आखोंदेखा हाल साक्षीदाराने सांगितला आहे.

Pahalgam Terrorist Attack : फक्त बारतालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच हादरवून टाकणारा नृशंस असा दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झाला. फिरायला आलेल्या निरपराध, निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून, दहशतावाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि 26 पुरूषांचा बळी घेतला. या हल्ल्याला (Pahalgam Attack) आता जवळपास 3 महिने होत आले असले तरी याप्रकरणात अजूनही रोज नवनवे खुलासे होत आहेत. पहलगाम हल्ल्याचे आदेश पाकिस्तानी नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचे गुप्तचर अहवालात उघड झाले होते. त्यातच आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे की, पर्यटकांना मारल्यानंतर दहशतवाद्यांनी आनंद साजरा करण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. या भयानक दहशतवादी हल्ल्याच्या एका प्रमुख प्रत्यक्षदर्शीने हे सत्य तपासकर्त्यांसमोर उघड केले आहे. पर्यटकांची हत्या केल्यानंतर “आनंद” म्हणून बंदूकधारींनी हवेत गोळीबार केला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याचे वृत्त समोर आले आहे.
इंडियन एक्प्रेसच्या वृत्तानुसार, एका प्रत्यक्षदर्शीने तपासकर्त्यांना सांगितले की, 22 एप्रिल रोजी 26 पर्यटकांना ठार मारल्यानंतर ‘सेलिब्रेशन’ म्हणून बंदूकधाऱ्यांनी हवेत चार राउंड फायर करताना त्याने पाहिलं. जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेने शोधून काढलेल्या या ‘स्टार प्रोटेक्टेड साक्षीदार’चा हल्ल्याच्या काही मिनिटांनंतर बैसरन व्हॅलीमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांशी सामना झाल्याचेही उघड झाले.
गेल्या महिन्यात, एनआयएने हल्लेखोरांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद या दोन स्थानिकांना अटक केली होती. ‘त्यांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आणि ते लष्कर-ए-तोयबाशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी केली. या हल्ल्याचा तपास पुढे सरकत असतानाच एनआयएला एक स्थानिक माणूस सापडला, आता तो मुख्य साक्षीदार आहे. हल्ल्यानंतर काही मिनिटांतच घडलेल्या घटनांची महत्त्वाची माहिती त्याने शेअर केली”, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
हवेत गोळीबार करत सेलिब्रेशन
26 नागरिकांना मारल्यानंतर बैसरन सोडत असताना बंदूकधारी दहशतवाद्यांनी त्याला थांबवलं, असं त्या साक्षीदाराने तपासकर्त्यांना सांगितले. ” एवढंच नव्हे तर त्यांनी (दहशतवादी) त्याला कलमा पढण्यासही सांगण्यात आलं आणि जेव्हा तो त्यांच्या स्थानिक भाषेत बोलू लागला तेव्हा त्या दहशतवाद्यांनी त्याला सोडून दिलं. (हल्ल्यानंतर) त्यांनी आनंदोत्सवात गोळीबार सुरू केला, हवेत चार राउंड फायर करण्यात आले” असेही त्याने (साक्षीदार) सांगितल्याचे सूत्रांनी सांगितलं.
त्या साक्षीदाराच्या जबाबाच्या आधारे, तपास पथकाने घटनास्थळावरून वापरण्यात आलेली चार काडतुसं जप्त केली. त्या साक्षीदाराने तेथे दहशतवादी सहाय्यक परवेझ आणि बशीर यांना एका टेकडीजवळ उभे राहून हल्लेखोरांच्या सामानाची देखरेख करताना पाहिले होते, जे बंदूकधारींनी अखेर त्यांच्याकडून हिसकावून घेतले, अशी माहिती तपासयंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे समोर आले आहे.
परवेझ-बशीरची सखोल चौकशी
हल्लेखोरांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद या दोघांना अटक केल्यावर तपासकर्त्यांनी त्यांची कसून चौकशी केली. हल्ल्यापूर्वी काय घडले होते हे त्यांच्या चौकशीतून आता समोर आलं आहे. ” या हल्ल्याच्या 1 दिवस आधी दुपारी 3.30 च्या सुमारास तीनही दहशतवादी माझ्या घरी आले आणि त्यांनी खायला मागितलं. त्यांच्याकडे शस्त्रही होती. माझ्या पत्नीने त्यांना जेवळ वाढलं आणि ते जवळपास चार तास (माझ्या) घरातच होते. बैसरनमधील सुरक्षा व्यवस्था, पर्यटन स्थळं, रस्ते आणि टाईम टेबलशी निगडीत अनेक प्रश्न ते आम्हाला विचारत राहिले” असा दावा परवेजने केल्याचे केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी सांगितलं.
” एवढंच नव्हे तर तिथून निघण्यापूर्वी त्या दहशतवाद्यांनी परवेझच्या पत्नीला काही मसाले आणि तांदूळ पॅक करण्यास सांगितले आणि त्या कुटुंबाला 500 रुपये देखील दिले. त्यानंतर ते बशीरला भेटले. त्या दहशतवाद्यांनी त्या दोघांना (परवेझ आणि बशीर) 22 एप्रिल रोजी दुपारी 12:30 वाजता बैसरनला पोहोचण्यास सांगितले ” अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांच्या सांगण्यानुसार, हल्लेखोरांपैकी एकाची ओळख सुलेमान शाह अशी झाली आहे, तो गेल्या वर्षी २० ऑक्टोबर रोजी श्रीनगर-सोनमर्ग महामार्गावर झेड-मोर बोगदा बांधणाऱ्या कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांच्या हत्येत सहभागी होता.
