मला झालमुडी खायला द्या… बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींची थेट दुकानात एन्ट्री
PM Modi : पंतप्रधानांनी आज पश्चिम बंगाल मधील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या. झारग्राममधील सभेवेळी ते स्थानिक बाजारात थांबले आणि स्वतः दुकानदाराकडून झालमुडी विकत घेतली.

संपूर्ण देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा आहे, सर्वच नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही बंगालमध्ये प्रचार करताना दिसत आहे. पंतप्रधानांनी आज पश्चिम बंगाल मधील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या. याच दरम्यान त्यांचा प्रचार कार्यक्रम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ते बंगालचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड झालमुडीचा आस्वाद घेण्यासाठी ते थांबले होते. झारग्राममधील सभेवेळी ते स्थानिक बाजारात थांबले आणि स्वतः दुकानदाराकडून झालमुडी विकत घेतली. त्या वेळी त्यांनी दुकानदाराशी संवाद साधत झालमुडीचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
आज बंगालमध्ये झालेल्या सभांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी राज्यात घुसखोरीमुळे भाषा आणि संस्कृती बदलण्याचा तसेच तुष्टीकरणाच्या राजकारणाद्वारे आदिवासी समाजाच्या हक्कांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. यानंतर ते सामान्य जनतेशी संवाद साधतानाही दिसले. त्यांनी प्रचारादरम्यान झारग्राममधील एका छोट्या दुकानात जात झालमुडी खाल्ली.
PM मोदींनी खाल्ली झालमुडी
पंतप्रधान मोदी यांनी हा व्हिडिओ X वर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते दुकानदाराला मला झालमुडी द्या असे म्हणत आहेत. दुकानदाराने पैसे घेण्यास नकार दिल्यानंतरही त्यांनी त्याला पैसे दिले. दुकानदार म्हणाला की, तुम्ही माझ्या दुकानात आलात, हेच आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. मात्र तरीही मोदींनी त्याच्या हातात पैसे ठेवले. झालमुडी तयार करताना दुकानदाराने विचारले, ‘आपण कांदा खातात का? यावर मोदी हसत म्हणाले, ‘हो, कांदा खातो, पण दुसऱ्याचं डोकं खात नाही.’ त्यांच्या या उत्तरावर दुकानदारासह उपस्थित लोक हसू लागले.
ঝাড়গ্রামে ঝালমুড়ি খাবার বিরতি! pic.twitter.com/t0TcDeONxt
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2026
TMC वर जोरदार हल्ला
आजच्या सभांमध्ये मोदींनी TMC सरकारवर टीका करत ‘ना शिक्षण, ना रोजगार, ना आरोग्य’ असा आरोप केला आणि आता TMCला जावेच लागेल असे म्हटले. त्यांनी महिलांच्या आरक्षणाला विरोध, मागासवर्गीयांसाठी केंद्राच्या योजनांना अडथळा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही TMCवर निशाणा साधला.