
Narendra Modi In WITT : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (WITT) या समिटला विशेष उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाताची आगामी काळातील वाटचाल याबाबत सविस्तर भाष्य केले. तसेच युद्धात भारताची भूमिका काय आहे? यावरही त्यांनी भाष्य केले. विशेष म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसने त्यांच्या काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्याच चुकीच्या निर्णयामुळे भारताचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा दावा मोदी यांनी केला. गेल्या पाच ते सहा वर्षात आम्ही काँग्रेसचे पाप धुण्याचे काम केले, असेही मोदींनी सांगितले.
राजकारणात व्यक्तिगत स्वार्थ आला तर लोक देशाच्या भविष्याऐवजी आपल्या भविष्याचा विचार करतात. २००४ पासून २०१० पर्यंत काय झालं. काँग्रेसच्या काळात पेट्रोल डिझेलचं संकट आलं होतं. तेव्हा काँग्रेसने देशाची नव्हे तर आपल्या सत्तेची चिंता केली. तेव्हा काँग्रेसने १ लाख ४८ हजार करोड रुपयांचे ऑईल बाँड जारी केले होते. आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, ते येणाऱ्या पिढीवर कर्जाचा बोजा टाकत आहे. ऑईल बाँडचा निर्णय चुकीचा आहे हे माहीत असूनही रिमोट कंट्रोलने सरकार चालवणाऱ्यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी हा चुकीचा निर्णय घेतला, असा आरोप मोदी यांनी केला. तसेच हा निर्णय घेतला कारण उत्तरदायित्व नव्हते. त्या बाँडवर रिपेमेंट २०२० नंतर करायचे होते. आमच्या सरकारने पाच सहा वर्षात काँग्रेस सरकारचे ते पाप धुण्याचं काम केलं आहे. त्या धुलाईचा खर्च कमी आला नाही. अशी लॉन्ड्री तुम्ही पाहिली नसेल. १ लाख ४८ हजार कोटी रुपयांच्या जागी देशाला ३ लाख कोटीहून अधिकचा पेमेंट करावा लागला. कारण त्यात व्याजही आलं होतं. आम्ही जवळपास दुप्पट रक्कम चुकवली. आजकाल काँग्रेसचे नेते भाषणांची मिसाईल सोडत आहेत, त्यांच्या या विषयाचा संदर्भ येताच त्यांची बोलती बंद होते, असा हल्लाबोलही मोदी यांनी केला.
पुढे बोलताना मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धावर भाष्य केले. मी आज लोकसभेत पश्चिम आशियातील युद्धावर बोललो. आज जगात जिथेही युद्ध होत आहे,. ते भारताच्या सीमेपासून दूर आहे. पण आजच्या काळात कोणताही देश युद्धाच्या दुष्परिणामापासून दूर राहू शकत नाही. अनेक देशात तर परिस्थिती अत्यंत खराब आहे. या परिस्थितीत आम्ही पाहत आहोत की राजकीय स्वार्थाने भरलेले लोक, काही पक्ष संकटाच्या या काळात आपल्यासाठी राजकीय संधी शोधत आहेत. त्यामुळे मी टीव्ही९च्या मंचावरून पुन्हा सांगतो, काळ संयमाचा आहे, संवेदनशीलतेचा आहे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.
आम्ही करोनाच्या काळातही पाहिलं की, जेव्हा देशवासिय एकजूट होऊन संकटाचा सामना करतात तेव्हा अनेक सार्थक परिणाम येतात. याच भावनेतून आपल्याला युद्ध परिस्थितीचा सामना करायचा आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.