पुन्हा मोठे काही घडणार, शस्त्रसंधीनंतरही नरेंद्र मोदींकडून बैठकांचे सत्र, हवाई दलाने म्हटले, ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरु

पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील उपस्थित होते. तसेच रॉ आणि आयबीचे प्रमुखही होते.

पुन्हा मोठे काही घडणार, शस्त्रसंधीनंतरही नरेंद्र मोदींकडून बैठकांचे सत्र, हवाई दलाने म्हटले, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली.
Image Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar | Updated on: May 11, 2025 | 1:13 PM

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. शस्त्रसंधीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन महत्वाच्या बैठका झाल्या. पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील उपस्थित होते. तसेच रॉ आणि आयबीचे प्रमुखही होते. या बैठकीत शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तानकडून झालेले हल्ले, शस्त्रसंधीचे झालेले उल्लंघन याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तीन बैठका घेतल्या. दोन तासापेक्षा जास्त वेळ ही बैठक सुरु होती. सोमवारी भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स) चर्चा करणार आहे. त्यापूर्वी ही बैठक झाली. शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये निर्माण झालेल्या तणावात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. तथापि, सीमेवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये संपर्क राखला जात आहे.

हवाई दलाकडून महत्वाचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरु असताना भारतीय हवाई दलाने गुरुवारी सांगितले की, हवाईदलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये दिलेली कामे अचूकतपणे यशस्वीरित्या पूर्ण केली. देशाच्या उद्दिष्टांनुसार हे ऑपरेशन्स विचारपूर्वक राबवले. ऑपरेशन अजूनही सुरु आहे. यामुळे वेळेवर योग्य माहिती दिली जाईल.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. भारताने या ऑपरेशनच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात काही मोस्ट वॉटेंड दहशतवादी आहे. तसेच दहशतवाद्यांची ९ तळ उद्ध्वस्त केली. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात  ही कारवाई केली.

पहलगाम घटना, ऑपरेशन सिंदूर आणि लष्करी कारवाई थांबवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामंजस्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेसने रविवारी केली. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी ही मागणी केली.

Follow Us