राहुल गांधी यांना ‘ब्रेक’ घेण्याचा बड्या राजकीय रणनीतीकाराचा सल्ला
Rahul Gandhi and Prashant Kishor: पक्षात राहुल गांधी यांच्या समंतीशिवाय कोणातीही निर्णय घेता येत नाही, असे पक्षातील नेते खासगीत मान्य करतात, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर प्रशांत किशोर यांनी टीका केल्याने काँग्रेस कडून आता काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला निवडणुकीत यश दुर्मिळ झाले आहे. २०१४ पासून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खालवत चालली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानसारखे राज्य काँग्रेसने गमावले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे असले तरी गांधी परिवाराचे पक्षावर वर्चस्व आहे. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे पक्षाचे कामकाज पाहत नाही. यामुळे राहुल गांधी यांच्यावरच पक्षाची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्राही काढली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना यश मिळाले नाही तर त्यांनी पक्षातून बाजूला व्हायला हवं, असा सल्ला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
काय म्हणतात प्रशांत किशोर
गेल्या दहा वर्षात राहुल गांधी यांनी स्वतःही काही केलं नाही आणि पक्षात दुसऱ्या कुणालाही काही करायला दिलं नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. एका डिजिटल माध्यमाला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी ही टीका केली आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, मागील दहा वर्षे राहुल गांधी अयशस्वी ठरले आहेत. त्यानंतर ते पक्षाची सूत्र दुसऱ्याकडे देण्यास तयार नाही. २०१९ मधील पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपण आता पक्षातून मागे होऊ. पक्षाची सूत्र दुसऱ्याकडे देऊ. परंतु त्यांनी तसे केले नाही. यामुळे राहुल गांधी यांनी आता ब्रेक घ्यावी, पक्षाची सूत्र अन्य कोणाकडे पाच वर्षांसाठी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
…तर हे शक्य नाही
पीके म्हणाले, ‘जगभरातील चांगल्या नेत्यांमध्ये एक चांगला गुण आहे. हे नेते त्यांच्यातील उणीवा स्वीकारतात. तसेच त्या दूर करण्याचा प्रयत्नही करतात. पण राहुल गांधींना सर्व काही माहीत आहे, असे वाटते. जर तुम्हाला वाटत नसेल की तुम्हाला मदतीची गरज आहे, तर कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. राहुल गांधी यांना असे वाटते की आपल्याला वाटेल तसेच काम करणारा कोणी मिळायला हवा, पण हे शक्य नाही.
काँग्रेसकडून काय येणार प्रतिक्रिया
पक्षात राहुल गांधी यांच्या समंतीशिवाय कोणातीही निर्णय घेता येत नाही, असे पक्षातील नेते खासगीत मान्य करतात, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर प्रशांत किशोर यांनी टीका केल्याने काँग्रेस कडून आता काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.