Thalapathy Vijay : सुपरस्टार विजयचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार? राज्यपालांच्या त्या विधानाने मोठा ट्विस्ट, 5 प्रश्नांनी आलं टेन्शन

तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक 108 जागा मिळाल्या आहेत, मात्र बहुमतासाठी ५ जागा कमी पडत आहेत. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही 113 चाच आकडा आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध केल्याशिवाय शपथ देण्यास नकार दिला असून, 5 प्रश्न विचारले आहेत. यामुळे विजयचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Thalapathy Vijay : सुपरस्टार विजयचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार? राज्यपालांच्या त्या विधानाने मोठा ट्विस्ट, 5 प्रश्नांनी आलं टेन्शन
थलपती विजय
| Updated on: May 07, 2026 | 2:23 PM

तामिळनाडूत सुपरस्टार थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. एकूण 108 जागा या पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे थलपती विजय हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण अवघ्या 10 जागा कमी पडत असल्याने त्यांच्या मार्गात अडथळा आला आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिल्यानंतरही पाच जागांचा पेच कायम राहतो. बहुमताचा 118 चा आकडा विजय थलपती गाठताना दिसत नाहीये. तरीही विजय थलपती यांनी राज्यपलाांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. पण राज्यपालांनी त्यांना जे सांगितलं त्यामुळे विजय थलपतीचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विद्यमान परिस्थिती पाहता विजय यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यास नकार दिला आहे. टीव्हीकेकडे सरकार बनवण्यासाठीचं पुरेसं बहुमत नाहीये. त्यामुळे बहुमत सिद्ध केल्याशिवाय विजय यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकत नाही, असं राज्यपाल अर्लेकर यांचं म्हणणं आहे.

बहुमत सिद्ध करा

विजय यांच्याकडे आवश्यक बहुमत असेल तरच त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा निर्णय राज्यपाल अर्लेकर यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. लोकभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी बहुमत सिद्ध केल्यास त्यांना राज्यपाल लगेच सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतील. तामिळनाडूत एक स्थिर सरकार देण्याचा राज्यपालांचा प्रयत्न असल्याचंही सांगितलं जात आहे.

113 आमदार असताना सरकार कसं बनवणार?

विजय यांच्या टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या आहेत. त्यांना बहुमतासाठी 10 जागांची गरज आहे. कारण बहुमत 118चं आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी विजय यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विजय यांचं संख्याबळ 113 झालं आहे. अजूनही बहूमतासाठी पाच जागा कमी आहेत. त्यामुळे राज्यपालांनी विजय यांना लोकभवनात बोलावून 113 आमदारांच्या बळावर सरकार कसं बनवणार? असा सवाल केला. बहुमत मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस योजना आहे का? असा सवालही त्यांनी विजय यांना केला आहे.

118 आमदारांचा पाठिंबा दाखवू शकले नाही

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी राज्यपालांना भेटू सरकार स्थापन करण्याचा दावा केला. पण राज्यपालांना 118 आमदारांचं पाठबळ असल्याचं दाखवू शकले नाही. हा आकडा बहुमतासाठी आवश्यक आहे, तोच आकडा ते दाखवू शकले नाही.

राज्यपालांचे पाच प्रश्न

राज्यपालांनी विजय यांना दुसऱ्यांदा लोकभवनात बोलावलं. तुम्ही बहुमतासाठीचा आकडा गाठू शकला का? तुमच्याकडे काही ठोस योजना आहेत का? असा सवाल राज्यपालांनी केला. राज्यपालांनी विजय यांना एकूण पाच प्रश्न विचारले. या पाच प्रश्नांमुळे विजय यांना चांगलंच टेन्शन आलं असणार.

113 आमदारांच्या बळावर सरकार कसं स्थापन करणार?

टीव्हीकेला दुसऱ्या कोणत्या पक्षांनी पाठिंबा दिलाय?

एवढ्या कमी पाठबळावर स्थिर सरकार देऊ शकाल?

बहुमत मिळेल या केवळ एका आशेवर मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाऊ शकते का?

मुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर बहुमत सिद्ध केलं नाही तर काय स्थिती होईल?

राज्यात कुणाकडे किती आमदार?

तामिळनाडू विधानसभा एकूण 234 सदस्यांची आहे. त्यामुळे बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 118 जागांची आवश्यकता आहे. टीव्हीकेकडे एकूण 108 आमदार आहेत. डीएमकेकडे 73 आमदार आहेत. तर एआयएडीएमकेकडे 53 आमदार आहेत. काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला समर्थन दिलं आहे. तरीही बहुमताचा आकडा टीव्हीकेला गाठता येत नाहीये. त्यामुळे विजय यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Follow Us