सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या वाट्याला थेट अर्थमंत्रिपद? गडकरी-फडणवीस नव्हे, या नेत्याचे नाव आघाडीवर

Union Cabinet Reshuffle : अनेक वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो, तर संघटनेतील काही नेत्यांना केंद्र सरकारमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्थखात्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्राच्या वाट्याला थेट अर्थमंत्रिपद? गडकरी-फडणवीस नव्हे, या नेत्याचे नाव आघाडीवर
union cabinet reshuffle Info
Image Credit source: Google
| Updated on: Jul 03, 2026 | 10:00 PM

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू आहे. अशातच 2 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि बी.एल. संतोष यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत सरकार आणि संघटनेतील नव्या चेहऱ्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. हा फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो, तर संघटनेतील काही नेत्यांना केंद्र सरकारमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्थखात्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या नेत्याला अर्थ खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबाबत दिल्लीतील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. विविध वृत्तांनुसार काही केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठवले जाऊ शकते, तर संघटनेतील काही वरिष्ठ नेत्यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे नाव अर्थमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गोयल यांना अर्थव्यवस्थेचे चांगले ज्ञान असल्याने त्यांच्यावर अर्थखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. गोयल हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

निर्मला सीतारामन अर्थमंत्री?

सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. त्या धर्मेंद्र प्रधान यांची जागा घेण्याची शक्यता आहे. अनुराग सिंह ठाकूर यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यांना कॅबिनेट खाते मिळू शकते, असे सांगितले जात आहे. युवा वर्गाशी असलेले त्यांचे चांगले संबंध त्यांच्या बाजूने जाऊ शकतात.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे नावही मंत्रि‍पदाच्या चर्चेत असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील तरुण चुग यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यसभेचा कार्यकाळ संपत असलेल्या हरदीप पुरी आणि बी.एल. वर्मा यांच्या जागी युवा खासदारांनी मंत्रिपद मिळू शकतेय. तसेच काही वरिष्ठ मंत्र्यांची राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

मित्रपक्षांनाही लॉटरी लागण्याची शक्यता

मोदी मंत्रिमंडळात एनडीएतील मित्रपक्षांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी एखाद्याला मंत्रिपद मिळू शकते. जेडीयू प्रमुख नीतीश कुमार यांनीही केंद्रात आपल्या पक्षाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका घेतल्याने जेडीयूला मंत्रिमंडळात अधिक जागा मिळू शकतात. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

Follow Us