बंगालमध्ये का टाळली जाते ही खास डाळ? कारण ऐकून थक्क व्हाल
भारतीय खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. परंतु एक अशी डाळ आहे, जिला बंगाली हिंदू मांसाहारी मानतात. चला, जाणून घेऊया या वादग्रस्त आणि ऐतिहासिक डाळीमागचं रहस्य.

आपल्या स्वयंपाकघरात डाळ म्हणजे रोजचं comfort food! डाळ-भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्णच वाटत नाही. ही डाळ आपल्या पचनासाठी उत्तम, पौष्टिकतेनं भरलेली आणि सगळ्यांच्या आवडीची असते. पण एक अशी डाळ आहे जिला काही बंगाली हिंदू मांसाहारी मानतात आणि ती म्हणजे लाल मसूरची डाळ. हो, आश्चर्य वाटतंय ना? पण खरंच काही पारंपरिक पद्धती आणि धार्मिक श्रद्धांमध्ये ही डाळ फक्त शाकाहारी नव्हे, तर मांसासारखी समजली जाते.
का मानतात काहीजण ही डाळ मांसाहारी?
लाल मसूर ही तामसिक श्रेणीतली डाळ मानली जाते म्हणजे अशी जी मन आणि शरीराला आळस, सुस्ती, नकारात्मक विचार आणि इतर तामसिक भावनांकडे नेते. जर या डाळीत कांदा-लसूण टाकून ती बनवली गेली, तर तिचं स्वरूप अजून तामसिक होतं. त्यामुळे काही परंपरेनुसार, ब्राह्मण, साधू-संत, आणि संन्यासी या डाळीपासून दूर राहतात. त्यांच्या आहारात फक्त सात्विक अन्नच असतं, आणि मसूरची डाळ त्या परिघाबाहेर आहे.
महाभारत कनेक्शन
द्वापर युगात घडलेली एक पौराणिक कथा सांगते की, हैहय वंशाचा राजा सहस्त्रबाहु अर्जुन ऋषी जमदग्निंच्या आश्रमात गेला आणि त्यांच्या कामधेनु या दिव्य गायीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाय जखमी झाली आणि तिचं रक्त जमिनीवर सांडलं. असं मानलं जातं की, जिथे-जिथे कामधेनूचं रक्त पडलं, तिथे मसूरची डाळ उगवली. त्यामुळे काही भक्त या डाळीला गायच्या बलिदानाशी जोडतात आणि त्यामुळे ती मांसाहारी समजली जाते.
बंगाल आणि वैष्णव परंपरेचं नातं
बंगालमध्ये गौड़ीय वैष्णववाद हा धार्मिक पंथ खूप प्रभावशाली आहे. या पंथात मसूरची डाळ मांसासमान मानली जाते. त्यांच्या मते, गडद रंगाचं, विशेषतः लालसर किंवा काळसर अन्न अशुभ मानलं जातं. त्यामुळे धार्मिक विधी, पूजा किंवा उपवास अशा वेळी मसूरची डाळ वर्ज्य केली जाते.
विधवांसाठी आहार मर्यादा
पूर्वीच्या काळात विधवा स्त्रियांसाठी शुद्ध सात्विक आहाराची कडक बंधनं होती. त्यांना मसूरची डाळ, लसूण, कांदा आणि पुई साग खाण्याची मनाई होती. कारण या अन्नांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील हार्मोन्स सक्रीय करतं आणि त्याचा मानसिक परिणाम होतो, असं मानलं जात होतं.
राहूच्या रक्तातून डाळ?
एक आणखी रोचक पुराणकथा अशी आहे की, भगवान विष्णूंनी जेव्हा दैत्य स्वरभानूचं मस्तक छाटलं, तेव्हा त्याचं रक्त जमिनीवर सांडलं. याच रक्तातून लाल मसूरची डाळ उगवली, असंही काही ग्रंथांत लिहिलं आहे. त्यामुळे काही संत, साधू आणि वैष्णव परंपरेचे लोक या डाळीपासून दूर राहतात.
मुगलांची खास आवड
इतिहास सांगतो की मसूरची डाळ इजिप्तमध्ये 2000 BCE मध्ये उगम पावली. ‘मिसरा’ या इजिप्शियन शब्दावरूनच ‘मसूर’ हे नाव पडलं. ही डाळ भारतात आली आणि मुगल सम्राटांनी आपल्या राजदरबारी जेवणात तिला स्थान दिलं. त्यामुळे तिचं महत्त्व अजूनच वाढलं.
तर मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणातली ही साधी वाटणारी लाल मसूरची डाळ ती केवळ प्रोटीनने भरलेला शाकाहारी पदार्थ नाही. तिच्यामागे महाभारताची कहाणी, पुराणकथा, धार्मिक श्रद्धा, आणि इतिहासाचा खोल संदर्भ आहे. कोणासाठी ही डाळ फक्त पोषण आहे, तर कोणासाठी श्रद्धा आणि परंपरेचा भाग. त्यामुळे ही डाळ म्हणजे इतिहास, धर्म आणि भावना यांचा एक सुरेख संगमच आहे.
