पावसाळ्यात साप घरात घुसण्याची भीती वाटते? मग करा हा सोपा देसी उपाय, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाचा धोका इतर ऋतुंपेक्षा अधिक वाढतो, कारण पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात, ते सुरक्षीत जागेच्या शोधात तुमच्या घरात देखील घुसू शकतात, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा आपल्याला जमिनीवर फिरताना दिसतात, पावसाचं पाणी बिळात गेल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. जेव्हा साप बिळातून बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असतात. ज्या ठिकाणी जास्त आद्रता असेल, ओलसरपणा आणि त्यांना लपण्यासाठी सोय असेल अशा जागेची निवड ते शक्यतो आपल्या निवाऱ्यासाठी करतात. जर अशा जागा तुमच्या घरात देखील असतील तर साप तुमच्या घरात घुसू शकतात. सापांबद्दल भारतात आजही अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे आपण अनेकदा साप दिसला की त्याला मारतो. त्यामुळे अनेक दुर्मिळ सापांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान तुम्हाला जर कुठे साप दिला तर त्याला मारू नका किंवा पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून त्याच्या सुरक्षित अधिवासात सोडतील. भारतामध्ये सापांच्या केवळ चार ते पाच प्रजातीच या विषारी आहेत. साप घरात येऊ नये म्हणून विविध उपाय केले जातात. जसं की सापांना मसाल्याचा तीव्र वास हा सहन होत नाही, त्यामुळे जिथे मसाल्याचे पदार्थ आहेत, अशा ठिकाणी साप कधीच येत नाहीत.
जर तुम्हालाही आपल्या घरात साप घुसण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही एक उपाय करू शकतात, तो म्हणजे कांदा आणि लसून यांची एकत्र पेस्ट तयार करा, ही पेस्ट पाण्यामध्ये मिक्स करून ज्या -ज्या ठिकाणावरून साप तुमच्या घरात शिरण्याची शक्यता आहे, अशा सर्व ठिकाणी ही पेस्ट फवारा, कांदा आणि लसूण यांच्या तीव्र वासामुळे साप तुमच्या घरात येणार नाही. तसेच तुमच्या घरात जर एखादी जास्त आद्रता असणारी आणि सतत अंधार असणारी जागा असेल तर अशी जागा नेहमी स्वच्छ ठेवा तिथे कुठल्याही प्रकारची अडचण ठेवू नका. तुमच्या घराचा परिसर हा स्वच्छ ठेवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गवत झपाट्याने वाढतं, अशा ठिकाणी साप लवकर नजरेस पडत नाहीत, त्यामुळे गवत वाढलं असेल तर ते कमी करा, तुमची बाग आणि परिसर स्वच्छ ठेवा, तिथे जास्त गवत वाढणार नाही, याची काळजी घ्या.
