सहा वर्षे हिमालयाएवढा लढा, भारताच्या ‘झोझिला’ यशामागील कहाणी
Zojila Tunnel : 13.153 किमी लांबीचा झोझिला बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण होणे भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बालताल (जम्मू-काश्मीर), 9 जून: मंगळवारी जेव्हा हिमालयात शेवटचा स्फोट झाला आणि ‘झोझिला बोगद्या’ची (Zojila Tunnel) दोन्ही टोके एकमेकांना जोडली गेली, तेव्हा ती केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी नव्हती. हिमवादळे, हिमस्खलन आणि गोठवणारी थंडी यांचा सामना करत अनेक वर्षे घालवणाऱ्या मेघा इंजिनीअरींगच्या शेकडो कामगार, अभियंते, यंत्रचालक आणि स्थानिक रहिवाशांसाठी हा एका अशा प्रवासाचा अंतीम टप्पा होता, जो क्वचितच कोणी विसरू शकेल.
13.153 किमी लांबीचा झोझिला बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण होणे भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण ठरला आहे. तरीही, यामागे जगातील सर्वात बांधकाम करण्यास कठीण परिस्थितींपैकी एक असलेल्या ठिकाणी दाखवलेल्या जिद्दीची आणि चिकाटीची मानवी कहाणी दडलेली आहे. जवळपास सहा वर्षे, बांधकाम पथकांनी 11500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर काम केले आणि अनेकदा उणे 30 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाचा सामना केला. हिवाळा केवळ थंडी घेऊन आला नाही, तर त्यासोबत हिमस्खलनाचे संकटही ओढवले.
जानेवारी 2023 मध्ये, निलग्रार बोगद्याच्या भागाजवळ एक मोठी हिमस्खलनाची घटना घडली. त्यानंतर काही दिवसांनी, दुसऱ्या एका हिमस्खलनात कामगार अडकले, ज्यामुळे भारतीय लष्कराच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबवावे लागले. 170 हून अधिक कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अनेक कामगारांसाठी ही एक आठवण होती की, हिमालयात निसर्ग हीच सर्वोच्च शक्ती आहे. तरीही, काम पुन्हा सुरू झाले.
या प्रकल्पात मेघा इंजिनीअरींगच्या 1200 हून अधिक लोकांनी योगदान दिले, ज्यामध्ये जवळपास 80 टक्के लोक जम्मू-काश्मीरमधील स्थानिक समुदायांमधील होते. त्यांनी संपूर्ण भारतातील बोगदा-बांधणी तज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, सुरक्षा तज्ञ आणि यंत्रचालक यांच्यासोबत काम केले. कामकाज अविरत चालू ठेवण्यासाठी, पर्वतांमध्ये एक संपूर्ण यंत्रणा (इकोसिस्टिम) उभी करावी लागली. कामगार विशेषतः विकसित केलेल्या छावण्यांमध्ये राहत होते; या मेघा इंजिनीअरींगच्या छावण्यांमध्ये वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वयंपाकघर आणि चोवीस तास काम सुरू ठेवण्यास सक्षम अशा निवासस्थानांची सोय होती.
हिवाळ्यात, ये-जा करण्याचे मार्ग खुले ठेवण्यासाठी ‘स्नो-ब्लोअर्स’ (बर्फ हटवणारी यंत्रे) सतत कार्यरत असत. अभियंते पर्वताच्या आत खडकांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असत, तर सुरक्षा पथके बाहेर हिमस्खलनाच्या धोक्यांवर लक्ष ठेवून असत. हा बोगदा पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील जीवनमान बदलण्याची अपेक्षा आहे. कारगिल आणि लडाखच्या रहिवाशांसाठी, हा प्रकल्प आरोग्यसेवा, शिक्षण आणि जीवनावश्यक वस्तूंचा अधिक विश्वसनीय पुरवठा करण्याचे काम करेल. व्यापाऱ्यांसाठी मालाचा पुरवठ्यातील अनिश्चितता कमी होईल.
पर्यटकांसाठी, यामुळे वर्षभर प्रवास करण्याची संधी निर्माण झाली आहे. मात्र, अनेक स्थानिक कुटुंबांसाठी हा बोगदा अधिक वैयक्तिक प्रगतीचे प्रतीक आहे: ते म्हणजे हंगामी विलगीकरणाचा अंत. टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात जेव्हा मेघा इंजिनीअरींगचे कामगार बोगद्याच्या जोडणीच्या ठिकाणाहून बाहेर आले, तेव्हा हे यश केवळ अभियंते आणि यंत्रांचेच नव्हते, तर त्या हजारो लोकांचेही होते ज्यांनी हवामान, उंची किंवा भौगोलिक परिस्थितीला आपल्या मार्गातील अडथळा बनू दिले नाही. हिमालयाच्या कुशीत त्यांनी पर्वताला छेदून एक मार्ग तयार केला आहे आणि कदाचित संपूर्ण प्रदेशाचे भविष्यच बदलून टाकले आहे.
