AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 जागी बॉम्बस्फोट अन् सेकंद काट्यावर धावणारी मुंबई थांबली!, अवघ्या दोन दिवसात शरद पवारांनी मुंबई कशी सावरली?

अवघ्या दोन दिवसात शरद पवारांनी मुंबई कशी सावरली? वाचा सविस्तर...

11 जागी बॉम्बस्फोट अन् सेकंद काट्यावर धावणारी मुंबई थांबली!, अवघ्या दोन दिवसात शरद पवारांनी मुंबई कशी सावरली?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 12, 2022 | 2:55 PM
Share

मुंबई : 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात धर्माधर्मात दरी निर्माण झाली होती. दुसऱ्या जातीधर्माच्या माणसाकडे द्वेष भावनेने बघत होते. अशात देशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु होते. याच काळात मुंबईवर एक संकट घोंघावत होतं. मुंबईला बेचिराख करण्याचा डाव (Mumbai Bomb Blast) रचला जात होता. दरम्यानच्या काळात देशाचं संरक्षण खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर दिल्लीत असणारे शरद पवार (Sharad Pawar Birthday) पुन्हा एकदा महाराष्ट्रात आले. 6 मार्च 1993 ला राज्याच्या प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्रिपदाचा कारभार आपल्या हाती घेतला. अन् पुढच्या सहाच दिवसात त्यांना अनपेक्षित पण तितक्याच गंभीर संकटाला सामोरं जावं लागलं. या संकट काळात शरद पवारांनी धैर्य दाखवलं. त्यांच्या एका वाक्याने लोकांमधील संताप कमी झाला. 24 तास धावणारी मुंबई एका घटनेमुळे निपतित पडली होती. पुढे पवारांनी या मुंबईला कसं उभं केलं याचीच ही गोष्ट…

गोष्ट मुंबई हल्ल्याची

12 मार्च, वार शुक्रवार, नेहमीप्रमाणे मुंबईच्या रस्त्यांवर गर्दी होती. लोकल आपल्या स्पीडने लोकांची ने-आण करत होती. कार्यलयं आपल्या वेळेत सुरु झाली होती. शरद पवारही मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचं कार्यालय असणाऱ्या सहाव्या मजल्यावर होते. थोडक्यात काय तर मुंबई आपल्या धुंदीत होती. पण इतक्यात अनपेक्षित घटना घडली. मोठा आवाज झाला. नेमकं काय झालं पाहण्यासाठी शरद पवार आपल्या कार्यलयाच्या खिडकीत गेले तर समोर असणाऱ्या एअर इंडिया कार्यालयासमोर लोक सैरावैरा पळताना दिसले. इतक्यात पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहोचले अन् परिस्थितीची माहिती पवारांना दिली. हा बॉम्ब स्फोटच असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं. याचवेळी दादरमधील शिवसेनेचं कार्यालय असणाऱ्या शिवसेना भवन, प्लाझा सिनेमा, मुंबई विमानतळ,सी रॉक हॉटेल, शेअर बाजार, पासपोर्ट ऑफिस, जुहू सेंटॉर हॉटेल, काथा बाजार, सेन्च्युरी बाजार, झवेरी बाजार या भागतही बॉम्ब स्फोट झाले होते. मुंबई हादरली होती.

ज्या भागात बॉम्ब स्फोट झाले ते सर्व भाग हिंदू लोकवस्तीचे होते. त्यामुळे जातीय तेढ अधिक ताणला जाण्याची शक्यता होती. हा दहशतवादी हल्ला असल्याचं एव्हाना स्पष्ट झालं होतं. त्यामुळे लोकांमध्ये आपआपसात मतभेद होऊन या घटनेला जातीय दंगली होणं मुंबई आणि देशाला परवडणारं नव्हतं, हे पवारांनी वेळीच जाणलं. टीव्ही आणि आकाशवाणीच्या माध्यमातून या घटनेची जनतेला माहिती दिली. तेव्हा 11 ऐवजी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं पवारांनी सांगितलं. ते बारावं ठिकाण होतं, मस्जिद बंदर. या मुस्लिम लोकवस्तीच्या भागातही बॉम्बस्फोट झाल्याचं सांगत पवारांनी जातीय दंगलींपासून मुंबईला सुरक्षित केलं.

पुढे 11 ऐवजी 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचं का सांगितलं? असा प्रश्न पवारांना विचारला गेला. तेव्हा जातीय दंगली टाळण्यासाठी आणि मुंबईला अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय आपण घेतल्याचं पवार सांगतात.

अन् मुंबई सावरली!

रोज घड्याळाच्या सेकंद काट्यावर धावणारी मुंबई या हल्ल्यानंतर शांत झाली होती. लोक आपआपल्या घरांमध्ये होते. लोकल ठप्प होती. बेस्टच्या बसेस डेपोतच होत्या. शाळा बंद होत्या. अशात मुंबईला पुन्हा उभं करणं सर्वात मोठं आव्हान होतं. बॉम्बस्फोट शुक्रवारी झाला. शनिवार आणि रविवारी बैठकांमागून बैठका घेतल्या. शहरातील जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, लोकल, बेस्ट या सुविधा तात्काळ सुरु झाल्या पाहिजेत अशा सुचना दिल्या. शिवाय शाळा कार्यलयं सुरु करण्यासाठीही बैठका घेत लोकांना विश्वास दिला. याने मुंबईकरांमध्ये विश्वास निर्माण झाला. शिवाय जगामध्ये मुंबई ‘जिवंत’ असल्याचा संदेश गेला. पुढे काहीच दिवसात मुंबईने आपला वेग धरला तो कायमचा…

भूकंपाने किल्लारी खिळखिळं झालं…

29 सप्टेबर 1993. मुंबईवरील हल्ल्याला केवळ सहा महिने झाले होते. गणपती विसर्जनाचा दिवस होता. राज्यभरातील सर्व गणपती विसर्जित झाल्यानंतर शरद पवार झोपण्यासाठी गेले. तेव्हा अचानकपणे खिडकीची दारं जोरजोरात आदळली. पवार झोपले होते तो पलंगही हादरला. तेव्हा पवारांना जाग आली त्यांनी कोयना धरण परिसरातील भूकंपमापन कार्यालयात फोन केला.तिथं फोन केल्यावर भूकंपाचं केंद्र लातूर असल्याचं समजलं. तसं संबंधित सचिवांना, आपल्या पीएला त्यांनी फोन केला आणि सकाळी 7 वाजेला लातूरला पोहोचायचं असल्यानं विमान तयार ठेवायला सांगितलं.

30 सप्टेबर 1993 सकाळी साडे सात वाजेला शरद पवार लातूरमध्ये पोहोचले. तिथं पोहोचल्यावर विदारक चित्र त्यांना पाहायला मिळालं. किल्लारी हे अख्खं गाव जमीनीखाली गाडलं गेलं होतं. यासोबतच पाऊस कोसळत होता. त्यामुळे मातीच्या ठिगाऱ्याखाली माणसं अडकली होती आणि त्यावरून पाण्याचे पाट पाहत होते. अशावेळी पवारांनी तात्काळ मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. जिथून आवाज येत आहेत, अशा ठिकाणी आधी मदत केली जाऊ लागली. काहींना जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. काहीजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ वैद्यकीय सोयी पुरवण्यात आल्या.काहींचे आप्त या आपत्तीने हिरावून घेतले. घरातल्या लोकांना प्राण सोडताना आपल्या डोळ्यांनी पाहिलं.शारिरिक इजांसोबतच मानसिक जखमा भळभळत्या होत्या.त्यांना मानसिक आधार देत पुढचा ढिगारा उकरला जात होता अन् माणसांना वाचवण्यासाठी दिवसरात्र एक केला जात होता. पुढचे कित्येक तास, कित्येक दिवस हे मदतकार्य सुरूच राहिलं.

हा भूकंप केवळ किल्लारीत झालेला नव्हता. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागातली अशीच परिस्थिती होती. त्यामुळे पवारांनी पुढचे काही दिवस आपला मुक्काम सोलापूरला हलवला. तिथूनच त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

लोकांना बाहेर काढल्यावर त्यांना औषधोपचारांसोबतच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. वाचलेल्यांना जगण्याची उमेद दिली जात होती. आता पुढच्या पावलाची गरज होती. वाचलेल्या या सगळ्या लोकांना घर द्यायचं होतं. त्यासाठी अमेरिकेहून मदत आली होती. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी दोन विमानांनी मदत साहित्य भारतात पोहोचवलं. यात 950 तंबू तयार होतील आणि 20 हजार लोकांना निवारा होईल इतकं 26 लाख चौरस फुटांचा प्लास्टिकचा कागद, औषधांचे 22 कंटेनर तसंच जखमींना औषधांसाठी लागणारी औषधं, पाण्यासाठी दोन हजार कॅन क्लिंटन यांनी पाठवली. त्यामुळे मोठा आधार मिळाला.

या आपत्तीमध्ये एक लाखांहून अधिक घरं बेचिराख झाली होती. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं? हा प्रश्न तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांना सतावत होता. अशात तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या मदतीनं जागतिक बँकेकडून अर्थ सहाय्य मिळालं. त्यातून या लोकांना घरं बांधून देण्यात आली. राजकीय नेते, उद्योजक, सामाजिक संस्थांनी गावं दत्तकही घेतली. त्यामुळे सरकारचा भार कमी झाला. पुढे वर्षभरातच भूकंपग्रस्त भागातील लोकांना हक्काची घरं मिळाली.

वर्षभरात एक लाख घरं तयार झाली. लोकांना कायमचा निवारा मिळाला. जगात पहिल्यांदाच एवढ्या संख्येने लोकांचं पुनर्वसन झालं. तेही केवळ एका वर्षाच्या कालावधीत! हा एक विक्रम पवारांच्या नावे नोंदला गेला.

कार्याची जागतिक स्तरावर दखल

त्यांच्या या कामाची महाराष्ट्रासह देशात आणि जगभर दखल घेतली गेली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समीतीची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पुढे गुजरातला भूकंप झाला. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी लगेचच या भूकंपानंतरच्या मदतीचं आणि तिथल्या पुनर्वसनाचं काम पवारां वर सोपावलं. शरद पवारांनी ज्याप्रकारे मुंबई दंगल आणि किल्लारीचा भूकंप हाताळला ते विशेष नोंद घ्यावी असं असल्याचं म्हणत वाजपेयी यांनी पवारांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली.

पवारांच्या या कार्याकडे पाहता त्यांच्या निर्णयाचं बळ काय असावं? त्यांचा स्वत:च्या कामावरचा आणि निर्णयांवरचा विश्वास हेच त्यांच्या या साऱ्या धाडसी निर्णयांचं गमक असावं.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?