
जगभरातील प्रतिष्ठित अशा 'कान फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर जोपर्यंत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन येत नाही, तोपर्यंत हा फेस्टिव्हल पूर्ण झाला असं समजू नये. दरवर्षी या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या आवर्जून हजेरी लावते आणि तिच्या लूकची सर्वत्र चर्चा होते.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही ऐश्वर्याच्या लूकची जोरदार चर्चा असते. अशातच बुधवारी ऐश्वर्या रायने कानच्या रेड कार्पेटवर आपला अनोखा अंदाज जगासमोर दाखवला. इतकंच नव्हे तर या लूकमधून तिने ट्रोलर्सना आणि जगाला सर्वांत मोठा संदेश दिल्याचं म्हटलं जात आहे.

आयव्हरी रंगाची साडी, त्यावर टिश्यू सिल्क दुपट्टा, गळ्यात रुबीची माळ आणि या सर्वांत उठून दिसणारं ऐश्वर्या राय बच्चनच्या भांगेतील लाल सिंदूर.. यातून तिला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याच ऑपरेशन सिंदूरविषयी माहिती जगाला देण्यासाठी भारताकडून शिष्टमंडळ 33 देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. अशातच ऐश्वर्याने तिच्या भांगेत सिंदूर लावून 'कान'च्या रेड कार्पेटवर ठळकपणे संदेश दिला आहे.

'कान'च्या रेड कार्पेटवर असंख्य सेलिब्रिटी पाश्चिमात्य स्टाइलमधील पोशाख मिरवत असताना साडी आणि सिंदूरमध्ये ऐश्वर्याने भारताची संस्कृती तिथे अधोरेखित केली.

ऐश्वर्याच्या सिंदूरमुळे तिच्या आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या चर्चा करणाऱ्यांचंही तोंड बंद झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा होत आहेत. अशा चर्चांदरम्यान ऐश्वर्याने तिच्या भांगेतील सिंदूरने अप्रत्यक्षपणे सर्वांना उत्तर दिलं आहे.