
डोंबिवलीमध्ये साप मुळे एका साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयात योग्य उपचार आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलीचा जीव गेला, असा गंभीर आणि संतापजनक आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षांची प्राणवी ही डोंबिवलीत मामाच्या घरी आली होती. ती आपल्या मावशीच्या बाजूला झोपली असताना पहाटे पाचच्या सुमारास तिला सापाने दंश केला. ती झोपेतून उठली. त्यानंतर तिला रडताना पाहतच तिच्या मावशीने तिला मिठी मारली मात्र, ती लहान असल्याने 'मला नेमकं काय होतंय?' हे ती बोलून सांगू शकली नाही.

थोड्या वळान तिच्या मावशीलाही सापाने दंश केला. तेव्हा चार वर्षीय मुलालाही सापाने दंश केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि कुटुंबियांना सत्य समजले. त्यानंतर घरातील सदस्यांनी तातडीने प्राणवीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले.

तिथे सुरुवातीला डॉक्टरांनी ' तिची प्रकृती ठीक आहे' असे सांगितले. पण नंतर प्राणवीची तब्येत अचानक खालावली. तिची परिस्थिती नाजूक होताच मुलीला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू असतानाच रुग्णालयाने वेळेवरती रुग्णवाहिका न दिल्याने चिमुरड्या प्राणवीने शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अखेरचा श्वास घेतला.

प्राणवीच्या मावशीवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण ग्रामीण भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणात साप असतात. रुग्णालयाकडे सापाचं औषध का नाही असा संतप्त सवाल देखील नातेवाईक करत आहेत. याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात आम्ही संबंधित रुग्णालयाकडून पूर्ण माहिती मागवली आहे, लवकरच याबाबत नेमकं काय घडलेलं ते समोर येईल असे सांगितले आहे.