
राज्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त झाले होते. परंतु आता मात्र हवामानात बदल झाला आहे. वातावरणात गारवा जाणवत असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात डिभे धरण क्षेत्राच्या परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. या पावसामुळे वातावरण अल्हाददायक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु मोठा पाऊस झाल्यास शेतीपिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नाशिक जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवडसह जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वाढली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने आता काढणीला आलेल्या गहू, कांदा, द्राक्ष, हरभरा पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनीही योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे हवमान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी 19 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

या दिवशी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. मुंबईतही वातावरण ढगाळ राहू शकते. महाराष्ट्रातील इतर काही भागांतही ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.