
मुंबई, कोकण, मुंबई उपनगरांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. या भागात मागच्या कित्येक तासांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आता हवामानाचा नवा अंदाज आला असून लोकांची चिंता वाढली आहे.

मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसाने येथील रस्ते पाण्याने तुडूंब भरले आहेत. तुंबलेले हे पाणी बाहेर काढण्यासाठी मुंबई पालिका पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण 525 वॉटर पम्प कार्यरत आहेत.

दरम्यान, आता पावसाचा नवा अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे मुंबईकर, कोकण, ठाणेकरांची चिंता वाढली आहे. या हवामानाच्या अंदाजानुसार पुढचे चार तास फार महत्त्वाचे असणार आहेत. नागरिकांनी या काळात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पालघर ते सिंधुदुर्ग, मुंबई-ठाणे व घाट भागात जोरदार ढगांची दाटी झाली आहे. त्यामुळे या भागांत पुढील 3-4 तासांत मध्यम-मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही ठिकाणी अधूनमधून खूप मुसळधार पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली असून या काळात नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच घराबाहेर जाताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.