
सांगली शहराच्या गल्लोगल्लीत सध्या एका वेगळ्याच 'दहशती'ची चर्चा आहे. ही दहशत आहे 'तडकडताई'ची....

ही कोणी चोरट्याची, पोलिसांची किंवा भुताची दहशत नसून, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला म्हैषासूर मर्दिनीचा वेष धारण करून शहराची रखवाली करण्यासाठी येणाऱ्या या 'तडकडताई'ची आहे.

ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला सांगलीत भावई यात्रेत जोगण्या उत्सवाची सुरुवात होते. या उत्सवाचाच एक भाग म्हणून 'काळी साडी, तोंडावर काळा मुखवटा आणि हातात सूप घेऊन सांगली शहरात धावणारी ही 'तडकडताई' लहान मुलांसाठी कुतूहल आणि भीतीचा विषय ठरते.

'तडकडताई, भुताची आई' असा गजर करत लहान मुले तिचे स्वागत करतात. जोगण्या उत्सव ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी ४ वाजता सुरू होतो.

कुंभार घराण्याकडे 'तडकडीचा' हा मान असतो. काळी साडी नेसून, हातात सूप घेऊन आणि चेहऱ्यावर तडकडीचा मुखवटा धारण करून तडकडताईच्या लग्नाची वरात काढण्यात येते.

कुंभारखिंड, सांभारे गणपती, सिटी हायस्कूल मार्गे ही वरात थेट स्मशानात पोहोचते. संध्याकाळी ६ वाजता, सूर्य अस्ताला जात असताना, शेकडो आबालवृद्धांच्या उपस्थितीत गव्हाच्या अक्षताने या तडकडताईचा विवाह पार पडतो.

विवाह पार पडल्यानंतर तडकडताई खोड्या करणाऱ्या बालकांना आपल्या सुपाने प्रसाद देते. या सुपाचा मार बसला की मुलांवरील इडापीडा टळते, अशी येथे आख्यायिका आहे. अमावस्येचा हा मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर, आषाढ महिन्यातील पौर्णिमेपर्यंत 'तडकडताई' शहरातील ठराविक भागात जाऊन जोगवा मागते.

'तडकडताई'चा दरारा खूप मोठा असून, अनेक लहान मुलेच नाही तर मोठी मुलेही तिला प्रचंड घाबरतात. संस्थान काळापासून सुरू असलेली ही आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा २१ व्या शतकातही सांगलीत मोठ्या उत्साहात जपली जात आहे.