
आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पराभवाची हॅटट्रीक साध्य केली आहे. गुजरात, हैदराबादनंतर आता राजस्थानकडून पदरी पराभव पडल आहे. होमग्राउंडवर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला.

सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. हरभजन सिंगच्या नकोशा विक्रमाची त्याने बरोबरी केली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्ससाठी सलग तीन सामने गमवणारा दुसरा कर्णधार आहे.

मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत पराभवाने सुरुवात केली. गुजरात टायटन्सने 6 धावांनी पराभूत केलं. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादने 31 धावांनी धोबीपछाड दिला. आता राजस्थान रॉयल्सने 6 गडी आणि 27 चेंडू राखून पराभवाचं पाणी पाजलं.

आयपीएल 2008 मध्ये हरभजनने मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा मुंबईच्या वाटेला सलग तीन पराभव आले होते. आरसीबीने 5 गडी राखून, चेन्नई सुपर किंग्सने 6 धावांनी आणि पंजाब किंग्सने 66 धावांनी पराभूत केलं होतं.

आयपीएल 2008 मध्ये हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व बदलत गेलं. शॉन पोलॉक, सचिन तेंडुलकर, ड्वेन ब्राव्हो, रिकी पॉटिंग, रोहित शर्मा, किरोन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादवने नेतृत्व केलं आहे. आता संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे आहे.

सलग तीन पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, "एक कठोर रात्र आहे. आमची सुरुवात एकदम निराशाजनक राहिली. मला काउंटर करायचा होता, आम्ही 150-160 च्या आसपास पोहोचण्याच्या चांगल्या स्थितीत होतो. पण माझ्या विकेटमुळे त्यांना खेळात परत येण्याची परवानगी मिळाली."