भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी; तीन कृषी कायद्यांवरून थोरातांचा निशाणा
भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी, जनतेपेक्षा सरकार मोठे नसते हे लक्षात घेतले पाहिजे अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केली आहे.
बुलडाणा – भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी, जनतेपेक्षा सरकार मोठे नसते हे लक्षात घेतले पाहिजे अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केली आहे. नवे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला. कृषी कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल दीड वर्ष वाट पहावी लागली. मात्र त्यांच्या आंदोलनाला यश आले, सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले आणि अखेर त्यांनी कायदे मागे घेतल्याचे थोरात यांनी म्हटले.
भाजपाकडून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न
पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले ही तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधी होते. हे कायदे रद्द करण्याची मागणी अनेकदा शेतकऱ्यांनी केली. मात्र कायदे रद्द होत नसल्याचे दिसताच या कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले आणि दिल्लीमध्ये तब्बल एक वर्ष आंदोलन चालले. याकाळात अनेकदा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपाने केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय झाला आणि कायदे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. या काळात काँग्रेस शेतकऱ्यांच्यासोबत होती आणि यापूढेही असेल. थोरात हे खामगावमध्ये आयोजित एका लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
विरोधकांकडून टीकेची झोड
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केल्यानंतर, विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तसेच येत्या काळात अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रस आणि राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येत आहे. भाजपाने कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली, याचा आम्हाला आनंद झाला, मात्र कायदे रद्द करण्यासाठी आता अधिवेशनाची वाट न पहाता ते तातडीने रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
संबंधित बातम्या