Maharashtra Assembly Session 2025 : ठाकरे गटाचे आमदार आमच्या पुढे कसे? काँग्रेसला सहनच झालं नाही, त्यांनी थेट…
Maharashtra Assembly Session 2025 : महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे परस्परांचे चांगले मित्र पक्ष आहेत. भाजप विरोधात त्यांची भक्कम आघाडी आहे. पण विधिमंडळात मात्र या मैत्रीला ग्रहण लागलं. नागपूर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना-भाजपची हिंदुत्वाच्या आधारावर तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची धर्मनिरपेक्षता या आधारावर युती होती. आजही ती आहे. पण मागच्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण मोठ्या प्रमाणत बदललं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक गट सत्ताधारी भाजपसोबत दुसरागट विरोधी पक्षामध्ये अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे. या महायुतीमध्ये भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष सोबत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस मित्रपक्ष आहेत.
पण विधिमंडळात आसन व्यवस्थेवरुन या मैत्रीला ग्रहण लागलं आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट व काँग्रेसमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. काँग्रेस आमदारांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. विधिमंडळात ठाकरे गटाच्या 20 आमदारांमध्ये 14 आमदारांची पुढील जागेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी फक्त ४ आमदारांना पुढे जागा दिली आहे. हे काँग्रेस आमदारांना पटलेलं नाही. त्यांना सहन होत नाहीय.
काय तोडगा निघतो? ते कळेलच
सिनियर असूनही काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांमागे बसावे लागत आहे. म्हणून त्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. आता यावर काय तोडगा निघतो? ते कळेलच. विधानसभेतील संख्याबळ पाहिलं, तर महाविकास आघाडीचे फक्त 46 आमदार आहेत. यात शिवसेनेचे सर्वाधिक 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. महायुतीच संख्याबळ 240 पेक्षाही जास्त आहे.
हायकोर्टाने नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन काळात, शहरातील अवैध राजकीय होर्डिंग्ज त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत.नागपूर शहरात ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्स लागले आहेत. मोठ्या प्रमाणात लावलेल्या या होर्डिंग्जमुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे येत आहेत.
