रक्त गोठवणारी थंडी, झोंबणारा गारठा… अंगात तेच टीशर्ट, ना स्वेटर ना टोपी, राहुल गांधींची यात्रा तुफ्फान चर्चेत

| Updated on: Jan 06, 2023 | 9:51 AM

7 डिसेंबर रोजी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरु झाली. 12 राज्यांतून फिरत ही यात्रा जम्मू काश्मीरमध्ये समाप्त होईल.

रक्त गोठवणारी थंडी, झोंबणारा गारठा... अंगात तेच टीशर्ट, ना स्वेटर ना टोपी, राहुल गांधींची यात्रा तुफ्फान चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः मुश्किलों के हर कोहरे को चीर, चलते रहेंगे हिम्मतवाले ये वीर… या उक्तीनुसार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) प्रचंड गारठ्यातही मार्गक्रमण करत आहे. उत्तर भारतात (North India) सध्या प्रचंड थंडीची लाट (Cold Wave) सुरू आहे. तापमानाच्या पाऱ्यानं 6  ते 7 अंशांची पातळी गाठली आहे. सोबतच अंगाला झोंबणाऱ्या थंड वाऱ्यांचे झोत आहेत. अशा स्थितीतही राहुल गांधींची यात्रा सुरु आहे, रोज सकाळी ज्या वेळेला यात्रा सुरु होते, त्याच वेळेला शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था हरियाणातून आज पुढच्या दिशेने निघालेला दिसून आला.

जो मौसम बदलने निकला है… उसे बदला हुआ मौसम क्या खाक बदलेगा.. अशा ओळींखाली भारत जोडो यात्रेच्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींच्या यात्रेचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. राहुल गांधींनी ज्या पेहरावात यात्रेला सुरुवात केली. तेच टीशर्ट घालून यात्रेचा पुढचा प्रवास सुरु आहे.

एवढ्या गारठ्यातही त्यांना स्वेटर, कानटोपी काहीही घातलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या फिजिकल फिटनेसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला किती फायदा होईल, हे आताच सांगणं कठीण आहे. मात्र राहुल गांधी यांच्या फिटनेसची ही मोठी परीक्षा घेतली जातेय.

शाही घराण्यातील राहुल गांधी ही भारत भ्रमणाची यात्रा पूर्ण करू शकतील की नाही, अशीच शंका यात्रेपूर्वी घेण्यात आली. त्यांच्या टीशर्टवरून चर्चा सुरु केली. मात्र ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी ती अविरत, अखंड सुरु ठेवली आहे, त्यानंतर राहुल गांधींच्या क्षमतांवर शंका घेणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे.

जिथं सूर्यही उगवला नाही, धुक्यांनं समोर दाट जंगल उभं केलंय, त्या भागातूनही भारत जोडो यात्रा घड्याळ्याच्या काट्याचं गणित तंतोतंत पाळताना दिसत आहे. सोशल मीडियावर तरुणाईकडून या जिद्दीचं कौतुक होताना दिसतंय.

7 डिसेंबर रोजी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरु झाली. 12 राज्यांतून फिरत ही यात्रा जम्मू काश्मीरमध्ये समाप्त होईल. 150 दिवसांच्या या नियोजनात 3,500 किलोमीटर अंतर पार करण्याचं उद्दिष्ट आहे. सध्या भारत जोडो यात्रा हरियाणातील पानिपत येथून मार्गक्रमण करत आहे.