Maharashtra News LIVE : इगतपुरीत पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया…
Maharashtra News LIVE : भंडारा जिल्हा आणि लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आता थांबलं असलं तरी शाब्दीक वादावादी सुरुच आहे. अभिनेत्री कंगना राणौत आणि सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यातील शाब्दीक युद्ध मीडियामध्ये गाजत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये पावसाच इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. अर्धातासापासून पडत असलेला पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच खळखळून भरून नाल्या वाहणार आहेत. जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
भिवंडीत झोपेतच काळाचा घाला, इमारत कोसळून तीन ठार
भिवंडीतील कोहिनुर हि धोकादायक इमारत रात्री 11 वाजता कोसळली. ढिगाऱ्याखालून 9 तासानंतर 3 रा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. त्याचबरोबर अजून काही जण ढिगार्याखाली असल्याची माहिती मिळत आहे. तीन मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तिन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
-
ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतली अभिजीत दिपके यांची भेट
ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अभिजीत दिपके यांचे अभिनंदन केले आहे.
-
-
इगतपुरीत पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया…
इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील कथरुवंगण येथील पाण्याची पाईप लाइन फुटल्याने रस्त्यावर हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. ही पाईप लाइन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-
कागदपत्रफुटी विरोधी विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ
राज्यसभेत कागदपत्रफुटी विरोधी विधेयकावर जोरदार चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हे विधेयक निरुपयोगी आहे. पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करत ते म्हणाले की, पंतप्रधान व्हिडिओ बनवतात, ते सभागृहात का येत नाहीत?
-
शुक्रवारी मुंबई , ठाणे , पालघर , रायगडला मुसळधार पावसाचा इशारा
उद्या मुंबई , ठाणे , पालघर , रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर आणि रायगडला आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्र किना-यावर 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
-
-
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, राजेंद्र आणि नाना यांना सात वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 55000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 4 ऑगस्टला सुनावणी
शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत पुढील सुनावणी आात 4 ऑगस्टला होणार आहे. बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात असल्याचा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच केली होती, असंही त्यांनी आपल्या युक्तीवादात सांगितलं.
-
‘एक राष्ट्र एक निवडणूक’ साठी स्थापन केलेल्या समितीचा कार्यकाळ वाढवण्यात आला
‘एक राष्ट्र , एक निवडणूक’ यावरील संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवण्यात आला आहे.
-
जंतर मंतर येथील हिंसक आंदोलनांसंदर्भात दिल्ली सरकारचा मोठा निर्णय
जंतर मंतर येथील हिंसक आंदोलनासंदर्भात दाखल झालेल्या खटल्यांबाबत दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी असलेल्यांविरुद्ध कोणतीही प्रतिकूल कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही सवलत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना लागू होणार नाही.
-
आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यावर मुंबईच्या पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
आरपीआय आठवले गटाच्या पदाधिकाऱ्यावर मुंबईच्या पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अंधेरी पूर्व मरोळ भागामध्ये एका व्यक्तीचा खासगी प्लॉटवर कब्जा केल्याप्रकरणी आरपीआय आठवले गटाचे अंधेरी तालुका अध्यक्ष आणि टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय खंडागळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय खंडागळे यांनी त्याचा मित्र छोटा कन्ना आणि त्याचा भाऊ मोठा कन्ना यांच्यासोबत 10 ते 15 महिला आणि पुरुष घेऊन खाजगी प्लॉट कब्जा करण्याचा केला प्रयत्न
-
जालना शहरात मुसळधार पावसाची हजेरी,अनेक ठिकाणी साचले पाणी
गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर जालना शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर अधिकच असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. तर काही ठिकाणी पाणी देखील वाहत असल्याचं पाहायला मिळालं.
-
Gen-Z वरील वक्तव्यावरून कंगना रणौत यांच्याविरोधात कल्याणात युवक काँग्रेस आक्रमक
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंगना रणौत यांचे गटारीत बसलेले पोस्टर हातात घेत पोस्टर फाडत पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला.
-
जालना शहरात मुसळधार पावसाची हजेरी,अनेक ठिकाणी साचलं पाणी
जालना शहरात मुसळधार पावसाची हजेरी,अनेक ठिकाणी साचले पाणी
गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर जालना शहरात मुसळधार पाऊस
पावसामुळे रस्ते जलमय, नागरिकांचे हाल
-
NEET 2026 गुणांबाबत मोठा निर्णय; औरंगाबाद खंडपीठाने चार याचिका फेटाळल्या
NEET 2026 गुणांबाबत मोठा निर्णय; औरंगाबाद खंडपीठाने चार याचिका फेटाळल्या
उत्तरपत्रिका (OMR) आणि उत्तरसूची (Answer Key) यांच्यात तफावत असल्याचा दावा करत दाखल करण्यात आलेल्या चार ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या
उत्तरपत्रिकेची पडताळणी केल्यानंतर कोणतीही तफावत आढळली नसल्याचं न्यायालयाचं निरीक्षण
उत्तरपत्रिकेत फेरफार किंवा गुणांकामध्ये चूक आढळली नसल्याने चार ही याचिका फेटाळल्या
-
जळगावच्या अमळनेरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
जळगावच्या अमळनेरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
या कारवाईत पोलिसांकडून गावठी कट्टा, काडतूस , 2 तलवारी जप्त 113 संशयितांची चौकशी
अवैध दारू, सट्टा जुगार, या अवैध धंद्यासह वाहतूक नियमभंग करणाऱ्यावर देखील पोलिसांनी कारवाई
मोहिमेत एक पोलिस उपाधिक्षक, आठ अधिकारी आणि ७२ पोलिस अंमलदारांचा सहभाग
कारवाईत अमळनेर शहरातील १६ हॉटेल आणि लॉजेसचीही तपासणी करण्यात आली
-
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी तुळजापूर येथे आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती
-
रत्नागिरीत चालत्या एसटीतून वाहक खाली पडल्याची धक्कादायक घटना
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बुधवार, 29 जुलै रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. केळशीहून दापोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील वाहक आसूद बाग ते गिम्हवणे दरम्यान चालत्या बसमधून खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहक बसच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन बसचा दरवाजा उघडताच ते थेट रस्त्यावर कोसळले. हा प्रकार पाहून बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवली.
-
अमरावती शहरातील हेल्मेट सक्तीला नागरिकांचा विरोध
अमरावती शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तथा वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक पोलीस प्रशासनाकडून शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडवण्याचं बाजूला ठेवून हेल्मेट सक्ती केली जात आहे याला आमचा विरोध आहे हेल्मेट सक्ती हा एक प्रशासनाचा स्कॅम आहे. शहरात दर्जात्मक नसलेले हेल्मेट विक्री केली जात आहे. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरती कुठलाही वचक प्रशासनाचा राहिला नाही यावर वेळी दखल घेतली नाही तर आम्ही सर्व अमरावतीकरणागरी पोलीस प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरती उतरू अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
-
पुणे माळीण दुर्घटनेला 12 वर्षे; जखमा अजूनही ताज्याच
मुसळधार पावसानंतर पहाटे डोंगराची प्रचंड दरड कोसळली आणि काही क्षणांत माळीण गाव उद्ध्वस्त झालं. अनेक कुटुंबे कायमची उध्वस्त झाली, तर काहींची संपूर्ण वंशपरंपराच संपुष्टात आली. अनेक दिवस चाललेल्या बचाव आणि शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आज माळीण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या दुर्घटनेत बचावलेल्या ची यावेळी भेट घेत त्याच्या आठवणीना उजळा देण्यात आला भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षितता, नियोजन आणि सतर्कतेची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
-
कशेडी घाटात महामार्गाला धोका; रस्ता खचल्याने लोखंडी गर्डर हवेत
मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे महामार्गालगतचा साईड पट्टीचा भराव वाहून गेल्याने रस्ता खचला असून लोखंडी गर्डर हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक सुरू राहिल्यास किंवा पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास महामार्गाचा काही भाग वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, कशेडी बोगद्याला पर्यायी असलेला हा जुना घाटमार्गही धोकादायक अवस्थेत आला असून, गेल्याच वर्षी या रस्त्याचे डांबरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले होते. या परिस्थितीमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
-
अमरावती शहरामध्ये गेली तासभरापासून जोरदार पाऊस
अमरावती शहरामध्ये गेली तासभरापासून जोरदार पाऊस सुरू. अमरावती शहरासह परिसरात हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीचा इशारा. पुढील दोन दिवस अमरावती शहर परिसरात जोरदार पाऊस बरसणार हवामान विभागाच्या वतीने अंदाज….
-
पुणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात शिंदे यांची शिवसेना आक्रमक
पुणे महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात शिंदे यांची शिवसेना आक्रमक. पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर शिवसेनेचे आंदोलन. शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.
-
नाशिकमध्ये पीडित कुटुंबासमोर दोन्ही शिवसेनेमध्ये जुंपली
शिंदेंच्या सेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक प्रवीण तिदमे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे गट नेते केशव पोरजे एकमेकांना भिडले. सत्तेतून बाहेर पडून आमच्या सोबत लढा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेत्याने शिंदेंच्या नगरसेवकांना आवाहन केले. सत्ताधारी असून तुम्ही आंदोलन करता , महापालिकेत तुम्हाला बोलू दिले जात नाही ठाकर यांच्या नगरसेवकांची शिंदेंच्या नगरसेवकांना डिवचले. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या मृत निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची अतिरिक्त आयुक्त सुवर्ण दखणे यांनी भेट घेतली
-
नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज दुपारी 1 वाजता जारी केलेल्या हवामान सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच नागरिकांनीही सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलांवर दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून पायी अथवा वाहनाने जाण्याचे धाडस करू नये. तसेच नदीकाठावरील पर्यटनस्थळांवर निर्धारित सुरक्षित मर्यादेपलीकडे जाऊ नये, असे आदेश ही जिल्हाधिकारी कर्डीले यांनी प्रेसनोट काढून दिले आहेत.
-
महाराष्ट्रात लँड टायलिंग ॲक्ट -चंद्रशेखर बावनकुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंती निमित्त राज्यात महाराजस्व शिबिर आयोजित केले आहे .फडणवीस यांनी सत्कार सन्मान स्वीकारले नाही. राज्यात विविध योजना लाभ देण्याचा आम्ही विचार केला. ७६ हजार परिवारांना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले. शिवाजी महाराज यांची प्रेरणा आम्ही स्वीकारली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल खात्याचे निर्णय घेतले त्यासाठी बैठक घेणार आहे. लवकरच महाराष्ट्रात लँड टायलिंग ॲक्ट येणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
-
गोंदियात चक्रीवादळाचे तांडव
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या परिसरात अचानक आलेल्या भीषण चक्रीवादळाने धुमाकूळ घालत मोठे तांडव माजवले. या नैसर्गिक आपत्तीत गावातील अनेक घरांवरील छते व पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत. अचानक सुटलेल्या वेगवान वादळी वाऱ्यामुळे गावात एकच घबराट पसरली. वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले, तर काहींच्या घरांचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीत उडणारे पत्रे लागल्याने व ढिगाऱ्याखाली सापडल्याने 8 नागरिक जखमी झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने गडचिरोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून प्रशासनाने तात्काळ घटनेचा पंचनामा करून बाधितांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे..
-
नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी ही उतरणार रस्त्यावर
ठाकरे , शिंदेंच्या शिवसेने पाठोपाठ आता नाशिक शहरातील खड्ड्यांच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी ही रस्त्यावर उतरणार आहे. राष्ट्रवादीच्या मनपा गटनेत्यांकडून खड्ड्यांच्या प्रश्नावर विशेष महासभा घेण्यासाठी महापौरांना पत्र लिहिले आहे. तर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांकडून थेट रस्त्यावर उतरण्याचा महापालिकेला इशारा दिला आहे. नाशिक शहरात पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याने विरोधकांसह सत्ताधारी ही आक्रमक झाले आहेत. शहरातील संपूर्ण रस्त्यांवर खड्डे पडल्याने खड्ड्यांच्या प्रश्नावर महासभा घेण्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी पक्षांची भाजपकडे विनवणी केली आहे.
-
बीड हा स्वाभिमानी मतदारसंघ; आविर्भावात राहणाऱ्या लोकांना हा मतदारसंघ दाखवून देईल – संदीप क्षीरसागरांचा इशारा
बीडच्या राजकारणात आता संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. बीड नगरपरिषदेतील शहर विकासाच्या ठरावावरून सत्ताधाऱ्यांमध्येच उफाळलेल्या वादाने नवे राजकीय वळण घेतले आहे. या वादात आता बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेत नाव न घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांना इशारा दिला आहे. “मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण बीड हा स्वाभिमानी मतदारसंघ आहे. कोणीही आविर्भावात राहू नये, हा मतदारसंघ दाखवून देईल अशा शब्दांत क्षीरसागरांनी टोला लगावला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.
-
नाशकात खड्ड्यांच्या मुद्यांवरुन ठाकरे सेना आक्रमक
नाशकात गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे चौथा अपघात झाला आहे, नाशिक महापालिकेत दोन्ही सेनेचे नगरसेवक आमने सामने आले आहेत. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
-
महिनाभरापूर्वी झालेला 6 कोटींचा रस्ता हाताने उखाडला
जालन्यात महिनाभरापूर्वी झालेला सहा कोटींचा रस्ता हाताने उखडत असल्याचा प्रकार बघायला मिळालाय.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून परतूर तालुक्यातील सोयंजना-हातडी ते येणोरा या 13 किलोमीटर रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं.सय्यद कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीने महिनाभरापूर्वी रस्त्याचं काम केलं आहे.मात्र अतिशय निकष्ट रस्ता बनवल्यानं हा रस्ता हाताने उखडत आहे.इतकं बोगस काम करूनही परतूर मंठा तालुक्यात सय्यद कन्स्ट्रक्शनला कोट्यवधी रुपयांची कंत्राटं कशी देण्यात आली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय. त्यामुळं या सगळ्या प्रकाराची चौकशी करून सय्यद कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
-
मृत कुटुंबीयांची मनपाचे अतिरिक्त आयुक्तांनी घेतली भेट
गेल्या दोन तासापासून सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्या दालना बाहेर बसलेल्या मृत कुटुंबीयांची मनपाचे अतिरिक्त आयुक्तांनी घेतली भेट. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या मृत निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची अतिरिक्त आयुक्त सुवर्ण दखणे यांनी घेतली भेट. भेट घेत केली विचारपूस.
-
आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून बोरिवली शिंपोली येथील एका वाईन शॉपवर कारवाई
आमदार संजय उपाध्याय यांनी बोरिवली शिंपोली येथील एका वाईन शॉपवर कारवाई करत अवैध सिगारेट, गुटखा आणि इतर वस्तूंच्या विक्रीचा पर्दाफाश केला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संजय उपाध्याय यांचा कार्यकर्ता त्याच्या खिशात सिगारेटचे पाकीट ठेवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यावर संजय उपाध्याय म्हणाले की, माझे सोशल मीडिया सांभाळणाऱ्या मुलावर खोटा आरोप करण्यात आला आहे. हा मुलगा दारू, सिगारेट किंवा असे काहीही घेत नाही. त्याच्या खिशातून काहीतरी खाली पडले होते आणि तो ते उचलून परत खिशात ठेवत आहे. संजय उपाध्याय म्हणाले की, जर कोणाला ते सिद्ध करायचे असेल, तर वैद्यकीय चाचणीसुद्धा करता येते. संजय उपाध्याय यांनी बोरिवलीमध्ये उघड्यावर मद्यपान आणि अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध कडक भूमिका घेतली.
-
मयत निलेश कोतकर यांच्या नातेवाईकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर ठिय्या
मयत निलेश कोतकर यांच्या नातेवाईकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे. मयत निलेश कोतकर यांच्या पत्नीला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
-
श्रीरामपुर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…
श्रीरामपुर शहरात कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या दारात फिर्यादीला जबरी मारहाण. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या. प्रवेशद्वारातच दोन युवकांना धारदार शस्राने मारहाण. मारहाणीत दोघे गंभीर जखमी. दाखल असलेला गुन्हा मागे घ्यावा म्हणून आरोपीच्या कुटूंबीयांनी केली मारहाण… जखमी दोघेही अल्पवयीन ; साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू. शहर पोलिसात नऊ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
-
ऑडिओ क्लिपवर रोहिणी खडसे यांचे विधान
ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर असं वाटतंय की तोंड उघडलं की गटार. भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मुखामध्ये राम तर यांच्या स्वभावामध्ये रावण आहे. हे संभाषण एका मंत्रासोबत केल्याची ऑडिओ आहे ते तरी महिलांबाबत कसं काय ऐकू शकतात. आम्ही तर विरोधक आहोत मात्र त्यांच्याच पक्षाच्या महिलांबाबत या ऑडिओ मध्ये संताप जनक. भाजपमध्ये आता संस्कृती राहिलेले नाही. अशाप्रकारे गटारी सारखी भाषा करणाऱ्यांनी मुळे महाराष्ट्राची बदनामी होत नाही का?. अशांचा राजीनामा न घेता त्यांना बंडतर्फ करायला हवं. या ऑडिओ क्लिप मुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महिलांबाबतची घाणेरडी वृत्ती समोर आली आहे. भाजपच्या हिना गावित यांच्याबाबतही घाणेरडे वक्तव्य वक्तव्य करणे चुकीचे आहे
-
भंडारा शहरातील काही भागांत आज सायंकाळी पाणीपुरवठा राहणार खंडित
भंडारा शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तांत्रिक कारणांमुळे आज सायंकाळी शहरातील काही भागांमधील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. नवीन जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पुरवठा बंद राहणार असल्याने शुक्रवारी परिसर, टाकळी, म्हाडा कॉलनी आणि यशोदा नगर परिसरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा आणि नगर परिषद भंडारा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
-
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेना नगरसेवकांचं महापौर दालनात आंदोलन सुरू
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेना नगरसेवकांचं महापौर दालनात आंदोलन सुरू आहे. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या परिवारातील सदस्य महापालिकेत दाखल झाले आहेत. घोषणाबाजी करत त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून समिती सदस्यत्वावरून काँग्रेसच्या दोन नगरसेविका आमनेसामने आल्या आहेत. KDMC मधील काँग्रेसच्या दोनच नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि समीना शेख यांच्यात समिती सदस्यत्वावरून वाद उफाळला आहे. समित्यांमध्ये वारंवार डावलल्याचा आणि नियुक्त्यांमध्ये हरियाणा प्रभारी संजय दत्त यांच्या हस्तक्षेपाचा आरोप करत काँग्रेस नगरसेविका समीना शेख यांनी जिल्हाध्यक्षांकडे लेखी तक्रार दाखल केली. तर”पुरेसे नगरसेवक नसल्याने गटनेत्या म्हणून समित्यांवर जावे लागते,” असे सांगत कांचन कुलकर्णी यांनी आरोप फेटाळले. काँग्रेस नगरसेविका हिचे वडील सलीम शेख यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत, पदांची मागणी करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला कांचन कुलकर्णी यांनी दिला.
-
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक
नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. नाशकात गेल्या काही दिवसांत खड्ड्यांमुळे चौथा मृत्यू झाला आहे. निलेश कोतकर नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून कोतकरांच्या परिवारातील सदस्य महापालिकेत दाखल झाले आहेत. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
-
ड्रग्जच्या अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे- फडणवीस
ड्रग्जच्या विरोधात आपल्याला ताकदीने उभं राहण्याची गरज आहे. सर्वांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. ड्रग्जच्या अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
पुढील तीन ते चार वर्षांत मुंबई ड्रग्जमुक्त होईल- फडणवीस
जगात सर्वांत जास्त तरुणाई भारतात आहे. भारत देश हा जगाचा महागुरू बनू शकतो. परंतु तरुणांना नशेच्या आहारी करून भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविद्यालयीन परिसरातही ड्रग्जची विक्री सुरू आहे. ड्रग्ज विक्रीला सर्वांना आळा घालण्याची गरज आहे. पुढील तीन ते चार वर्षांत ड्रग्जमुक्त मुंबई होईल, असं आश्वासन फडणवीसांना दिलं आहे.
-
नशेखोरीविरोधात आपल्याला युद्ध पुकारावं लागेल- फडणवीस
हा भारत आता जुना भारत नाही. हा नवीन भारत आहे, या भारताला आता थांबवता येणार नाही, हे शत्रूंनाही माहीत आहे. पाकिस्तानात घुसून मारणारा हा भारत आहे. भारताला आतून पोकळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नशेखोरीविरोधात आपल्याला युद्ध पुकारावं लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळीत संपन्न झाला. हजारो शालेय चिमुरड्यांना सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, डोम, वरळी इथं देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज फ्री समाजाची शपथ दिली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत नशामुक्तीबाबत शपथ दिली गेली आहे. यावेळी कौशल्य विकास मंत्री, नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
-
बनावट डिग्रीचं रॅकेट हे फक्त रमेश मुखेकरपुरतंच मर्यादित नाही- रोहित पवार
रोहित पवार यांनी पुणे विद्यापिठाची प्रेसनोट शेअर केली आहे. ते म्हणाले, “बनावट डिग्री कोणाकोणाला दिली, याची चौकशी करा. अनेक बोगस पदवी प्रमाणपत्र दिले गेले असतील. बनावट डिग्रीचं रॅकेट हे फक्त रमेश मुखेकरपुरतंच मर्यादित नाही. माध्यमांनी विषय उचलल्यानंतर निलंबनाची कारवाई झाली.”
-
मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानावर गैरव्यवहाराचे आरोप; प्रथम क्रमांकावर प्रश्नचिन्ह
धाराशिव जिल्ह्यातील मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध अभियानाच्या निकालावर वाद निर्माण झाला आहे. आदर्श गाव जाकेकुरवाडीच्या सरपंचांनी अभियानात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. बनावट प्रमाणपत्रे सादर करून लोहारा तालुक्यातील एकोंडी गावाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात आला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अभियानात प्रथम – एकोंडी (लोहारा), द्वितीय – बारूळ (तुळजापूर) आणि तृतीय – जाकेकुरवाडी (उमरगा) असा निकाल जाहीर झाला आहे. योग्य चौकशी नाही झाली तर अमरण उपोषण करण्याचा सरपंचासह गावकऱ्यांनी इशारा दिला आहे.
-
अभिजीत दीपके यांचा रामदेव बाबांना टोला
पेपर फुटीच्या विरोधात लढून बदनाम केलंय. यालाच संस्कृती म्हणतात. संविधानाच्या मार्गावर चालणं, आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, गांधीजींचा फोटो घेऊन आंदोलन करणं जर संस्कृतीला बदनाम करणारं असेल तर रामदेव बाबांना सांगा आम्ही संस्कृती करतोय बदनाम. तुम्ही जे पतंजलीचे प्रोडक्ट्स बनवत आहात, त्यावर कोर्टाने फसवणूक होतेय म्हटलंय त्यावर लक्ष द्या, अशा शब्दांत दिपके यांनी रामदेव बाबांना टोला लगावला.
-
CJP ला बाहेरून फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्री शहांचं अपयश – अभिजीत दीपकेंचे टीकास्त्र
शेतकऱ्यांना गरज पडली तर आम्ही मदत करायला तयार आहोत, असं CJP चे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांन गृहमंत्री अमित शहांवरही टीका केली. CJP ला बाहेरून फंडिग येतं असं म्हटलं जातंय, अमित शहा गृहमंत्री असूनही असा प्रकार होत असेल तर ते त्यांच अपयश झालं ना. चाणक्य कसले मग ते, असा उपरोधिक सवाल करत दीपकेनी टीकास्त्र सोडलं.
-
दिल्लीतील आपच्या कार्यालयावर भाजपचं आंदोलन
दिल्लीतील आपच्या कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन सुरू आहे. पंजाबमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ भाजपकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.
-
जळगावला आज रेट अलर्ट, मुसळधार पावसाला सुरुवात
जळगाव जिल्ह्यात आज हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तीन ते चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज जिल्ह्यात पुन्हा जोरदार आगमन केलंय. मुसळधार पावसामुळे जामनेर शहरात व्यापारी संकुलात पाणी साचलं असून रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं, याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं? याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. अंतिम युक्तीवादासाठी सुप्रीम कोर्टाकडून आज तारीख निश्चित केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या चार वर्षापासून प्रकरण प्रलंबित असून, त्यामुळे आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागलं आहे.
-
इंडिया आघाडीच्या खासदारांचं संसद परिसरात आंदोलन
इंडिया आघाडीच्या खासदारांचं संसद परिसरात आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी आंदोलनावरून केलेल्या कारवाईवरून इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक झाले आहेत. तसेच विद्यार्थी आंदोलन आणि इतर मुद्यांवरून खासदारांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं. यावेळी खासदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदारांकडे पोस्टर देखील होते.
-
आरक्षण हटाव समितीच्या वतीने नागपुरात आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीनंतर आता काही तरुणांकडून आरक्षण हटवण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरही या मागणीसाठी प्रचार केला जात आहे. आता या आरक्षण हटाव समितीने नागपुरात आंदोलन केलं. या आंदोलनात काही तरुणी-तरुणींनी आरक्षणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
-
Sangli Rain : सांगलीत जोरदार पाऊस, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सांगली जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे. कृष्णा आण व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळी वाढ झालीये. चांदोली धरणातून सोडण्यात पाणी सोडण्यात येत असल्याने वारणा नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही हळूहळू वाढ होत आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
ajinkya rahane : अंजिक्य रहाणेने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
अंजिक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अंजिक्य हा मागील 3 वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याच्या टीम इंडियाच्या दिग्गज क्रिकेटपटूमध्ये समावेश व्हायचा. त्याने आज एक पोस्ट लिहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त केल्याची घोषणा केली.
-
नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागाला मुसळधार पावसाचा इशारा; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने 31 जुलैला नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे सर्व यंत्रणांना सतर्क राहून आपत्कालीन नियोजन पूर्ण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी धरणांमध्ये आवश्यक बफर साठा राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूर नियंत्रण कक्षाला धरणांतील पाणीसाठ्यावर सातत्याने लक्ष ठेवून वेळेवर नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
-
पुण्यात संगमवाडी पार्किंगजवळ कारचा अपघात
पुण्यात संगमवाडी पार्किंग क्रमांक तीन जवळ एक कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. कारमध्ये दोन इसम अडकले होते. त्यानंतर कारच्या धडकेने झाड खोडासकट तुटून फूटपाथवर पडले. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि कारचालकांनी एका व्यक्तीस बाहेर काढलं. पोलिसांच्या नागरिकांच्या आणि येरवडा अग्निशमन केंद्र व कसबा अग्निशमन केंद्राच्या मदतीने स्टेरिंग आणि दरवाजामध्ये चालकाचा पाय अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.
-
आमदार तानाजी सावंत यांचा पुण्यातून तहसीलदारांना फोन
आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील 7 महसूल मंडळे पीकविम्यातून वगळली शेतकरी संतप्त.अतिवृष्टीग्रस्त भागातील 7 महसूल मंडळे पीकविमा भरपाईतून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, अतिवृष्टीच्या वेळी ज्या भागाची आमदार सावंत यांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली त्याच महसूल मंडळांना विम्यापासून वंचित ठेवण्यात आले.
-
उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद
शहर विकास रखडला,नगरसेवकांचा ६५ लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास? गुवाहाटी दौऱ्यावरून खळबळ. प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल
-
कोयना धरणाचे वक्री दरवाजे पाच वाजता उघडणर
कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फूट उघडून 5079 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात पाच वाजता करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे.
-
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील आळगे बंधारा पाण्याखाली
पुणे जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं.. अक्कलकोट तालुक्यातील आळगे बंधाऱ्यावरून पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.. वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या भीमा नदी पात्रात जवळपास 60 हजारचा विसर्ग वाहत आहे. भीमा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..
-
अन्न व औषध प्रशासनात कर्मचाऱ्यांचा आयुक्तांविरोधात एल्गार
२९ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन. अपुरे मनुष्यबळ असतांना लॅब मध्ये काम करण्यासाठी दोन शिफ्ट, शनिवारची सक्ती व रजा निर्बंधांवर गंभीर आक्षेप. जुनी कार्यालयीन वेळ पूर्ववत करा; दोन शिफ्ट तात्काळ रद्द करण्याची मागणी
काय आहेत का मित्रांच्या मागण्या. – 1) शासन निर्णयानुसार पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी. – 2) दोन शिफ्टची कार्यपद्धती तात्काळ रद्द करावी. – 3) इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे शनिवार-रविवारच्या शासकीय सुट्ट्यांचा लाभ द्यावा. – 4) रिक्त पदे भरून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि अतिरिक्त कामाची दखल घ्यावी.
-
पावसाचा ऑरेंज अलर्ट कुठे?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.
-
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्देवी मृत्यू
नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका नागरिकाचा दुर्देवी मृत्यू. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे दुचाकीला अपघात. अपघातात नीलेश कोतकर (वय 40) यांचा उपचारादरम्यान मृत्यू. गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांमुळे झालेला हा पाचवा मृत्यू.
-
वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ
गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले असुन 1 लक्ष 27 हजार 256 क्युसेकने सध्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
-
गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसामुळे मोठी वाढ
भंडारा जिल्हा आणि लगतच्या गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या सततच्या या पावसामुळे पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याचा वाढता साठा नियंत्रणात आणण्यासाठी धरण प्रशासनाकडून आता सर्व ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून १ लाख ३५ हजार ६९१ क्युसेक वेगाने वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे वैनगंगा नदीकाठच्या सर्व गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
-
Nanded Rain : नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात
नांदेड शहरासह काही भागात सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. अर्धातासापासून पडत असलेला पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे. या पावसामुळे पहिल्यांदाच नद्या, नाले भरुन वाहणार आहेत. जलसाठे भरण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आणखीन मोठ्या पावसाची गरज आहे.
Published On - Jul 30,2026 8:30 AM
