..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Aug 14, 2021 | 4:24 PM

शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल अत्यंत स्फोटक पत्र गडकरींनी लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तत्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गडकरींच्या या पत्रावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला आहे.

..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Follow us on

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामात होत असलेल्या अडवणुकीबाबत एक पत्र लिहिलं आहे. शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या अडवणुकीबद्दल अत्यंत स्फोटक पत्र गडकरींनी लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तत्काळ दखल घेत थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गडकरींच्या या पत्रावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला आहे. (Nana Patole Criticizes Nitin Gadkari overGadkari’s letter to CM Uddhav Thackeray)

महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं काम व्हायला पाहिजे. जे लोक याला विरोध करतात, काम बंद पाडतात, त्यांचं समर्थन काँग्रेस करत नाही. रस्ते व्हावे या बाजूने काँग्रेस आहे. पण 25 वर्षे शिवसेना आणि भाजप एकत्र होती. तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते, हे माहिती नव्हतं का? आता कुणाच्या इशाऱ्याने गडकरींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे? असा सवाल नाना पटोले यांनी ेकलाय. त्याचबरोबर महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

‘त्यांना वरुन दाढीवाल्यानं आरोप करायला सांगितलं का?’

यापूर्वी भाजप आणि सेनेची युती होती. त्यावेळी गडकरींनी कधी शिवसेनेवर टीका किंवा आरोप केले नाहीत. आज मात्र ते शिवसेनेवर पत्र लिहून आरोप करत आहेत. त्यांना वरुन दाढीवाल्यानं आरोप करायला सांगितलं का? असा खोचक सवालही पटोले यांनी केलाय. महामार्गाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार असल्याची अनेक पत्र त्यांच्या मंत्रालयाला दिली आहे. त्याची चौकशी आणि एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी काढावी. महामार्गाची कामं झाली पाहिजेत. जर या कामात कुणी अडथळा आणत असेल तर त्यांना काँग्रेस विरोध करेल, असंही पटोले म्हणाले.

गडकरींच्या पत्रातील 5 महत्वाचे मुद्दे

1. अकोला आणि नांदेड या 202 किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी 12 किमी) निर्माण करण्याचे काम सुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

2. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गेच काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेले आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचे काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

3. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे किंमत 135 कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होते, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदाराचे अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

4. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे यापुढेही सुरु ठेवावीत की कसे? याबद्दल आमचे मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामे आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचे प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल.

5. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. महाराष्ट्राचे आणि जनतेचे नुकसान होईल.

संबंधित बातम्या :

कामं थांबवा, नितीन गडकरींच्या स्फोटक पत्रानंतर आता शिवसैनिकाची कथित Audio क्लिप समोर

गडकरींच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल, पोलीस महासंचालकांना ‘हे’ आदेश

Nana Patole Criticizes Nitin Gadkari overGadkari’s letter to CM Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI