अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
Ajit Pawar : शिवसेनेच्या फुटीला वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता हा भूकंप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्यासोबत आला आहे. हा गट शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेचे ४० आमदार भाजपसोबत आले अन् राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसने
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही. हे भारतीय जनता पक्षाचे ऑपरेशन लोट्स आहे. लवकरच गेलेले सर्व आमदार परत येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
अजित पवार यांनी यापूर्वी २०१९ मध्ये बंड केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ते बंड मोडून काढले होते अन् फडणवीस सरकार काही तासांत कोसळले होते. आता अजित पवार यांचे बंड पुन्हा शरद पवार मोडून काढणार? अजित पवार यांच्यांसोबत गेलेले सर्व आमदार परत येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी केली.
अजित पवार यांच्या गटातून कोण मंत्री
अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील हे मंत्री झाले आहेत. त्यातील छगन भुजबळ अन् दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे जवळचे असल्याचे समजले जात होते. परंतु ते ही आता अजित पवार यांच्यासोबत गेले आहे. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणण्यात शरद पवार यांना यश येणार का? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे
