उद्धव ठाकरे यांचीही येणाऱ्या काळात अडचण वाढू शकते; वाझे प्रकरणावरून पावसकरांना नेमकं काय सूचवायचंय?
हिंदुत्वाची वज्रमुठ उशिरा का असेना त्यांनी आवळली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मूठ आवळली होती. यांना त्याची आता आठवण आली.
गिरीश गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: सचिन वाझे हे नक्कीच निलंबित अधिकारी होते. पण त्यांना मुख्यमंत्र्यांनीच बढती दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे मुख्यमंत्री होते. याच वाझेंनी उद्योगपती अंबानी (ambani) यांच्या घराबाहेर जिलेटिन ठेवले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी वाझेने असं काय मोठं केलं? असा सवाल केला होता. त्यांनी एका मुलाखतीत तसं म्हटलं होतं. अंबानीच्या घराजवळ जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या यापेक्षा अजून काय मोठं हवं होतं. हे सर्वात मोठं होतं. मला वाटतं येणाऱ्या काळात अजून काही गोष्टी बाहेर पडतील. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याही अडचणी वाढू शकतात, असा सूचक इशारा शिंदे गटाचे नेते किरण पावसकर (kiran pawaskar) यांनी दिला आहे. पावसकर यांच्या या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा इशारा दिला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनाही डिवचले. आदित्य ठाकरे खरोखरच कर्तृत्वान असते आणि त्यांना निवडणूकच लढवायची होती तर त्यांनी मातोश्री परिसरातील वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढायचे होते. मात्र, ते वरळीतून लढले. यातच सर्व काही आलं, असा चिमटा किरण पावसकर यांनी काढला.
वरळीतील शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा मोठा धक्का नाही. ही धक्क्याला लागण्याची सुरुवात आहे. त्यांना अजून मोठा धक्का द्यायचा आहे, असं ते म्हणाले. वरळीतील असंख्य प्रश्न आहेत. ते स्वत: कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. पण अडीच वर्षात काहीच होऊ शकले नाही. वरळीकरांचे प्रश्न सोडवले गेले नाही, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याशिवाय कधीच दिवाळी साजरी झाली नाही. पहिल्यांदाच आंदोलन न करता त्यांची दिवाळी साजरी होत आहे. तुम्ही आंदोलन करू नका. मला तुम्हाला काही द्यायचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आणि दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
आज वर्षा बंगल्यावर आज लोक येऊ शकतात. महाराष्ट्राचं जे पॉवर हाऊस आहे, तिथे लोक येतात. यावरून मुख्यमंत्री जनतेचा आहे, हे पहिल्यांदा चित्रं दिसत आहे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण कुणालाही वर्षावर जाता आलं नाही. मुख्यमंत्र्यांना भेटता आलं नाही. पण या मुख्यमंत्र्यांना भेटता येतं. त्यांच्याशी मुख्यमंत्री बोलत आहेत, असंही ते म्हणाले.
हिंदुत्वाची वज्रमुठ उशिरा का असेना त्यांनी आवळली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मूठ आवळली होती. यांना त्याची आता आठवण आली. खरं तर शिंदेंमुळेच त्यांना हिंदुत्वाची आठवण आली आहे.
तुम्ही दुहृदय सम्राट हे नाव सोडून वंदनीयवर आला होता. तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं. शिंदे साहेबांनी कामाला सुरुवात केल्यावर तुम्ही पुन्हा हिंदुत्वाकडे आलात. मी हिंदूं तर्फे तुम्हाला धन्यवाद देतो. उशिरा का असेना तुम्ही कामाला लागला, असा चिमटा त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.