Vishwanath Mahadeshwar : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अडचणीत
मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता त्याप्रकरणी महाडेश्वर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांना अटक झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाला होता त्याप्रकरणी महाडेश्वर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना भेटायला किरीट सोमय्या गेले असता त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यात किरीट सोमय्या जखमी झाल्याचीही माहिती समोर आली होती. त्यानंतर खार पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग आणला होता. यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रारही महाडेश्वर यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र महाडेश्वर यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून खार पोलिसांनी विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली आहे.
खार पोलिसांकडून महाडेश्वरांना अटक
किरीट सोमय्या यांनी या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी हा गुन्हा खार पोलिसांकडे वर्ग केला होता. त्यानंतर खार पोलिसांनी तपासानंतर ही कारवाई केल्याचे समजते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्या शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून किरीट सोमय्या यांच्यावरही शिवसेनेकडून अनेक आरोप करण्यात आले आहेत.
सोमय्यांचा कंगावा सुरू
भाजपचं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी यासाठी कारस्थान सुरू आहे. त्यासाठी भाजपने राणा आणि कंगना यांच्यासारखी लोक नेमली आहेत. असा थेट आरोप शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांच्याकडून करण्यात आलाय. तर किरीट सोमय्या आणि मोहीत कंबोज यांच्यासारखे नेते अशा ठिकाणी मुद्दाम जातात, आणि हल्ला झाल्याचा कंगावा करतात, असेही मनिषा कायंदे म्हणाल्या आहे.
ही नौटंकी आहे
तर महाडेश्वरांना अटक करून सोपी कलमं लावून सोडून द्यायचे असेल तर तरी नौटंकी आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावाल आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर गुन्हे लावून महाडिकांमार्फत सोमय्या यांची हत्या करण्याचा कट होता, हे शोधण्याचा प्रयत्न होता का, याचा शोध घेतल्यास या अटकेला अर्थ आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत. तर इतर कुणाला कोणतीही इजा झाली नाही, सोमय्या यांनाच कशा जखमा झाल्या असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आलाय. त्यामुळे या अटकेनंतरही जोरदार राजकारण तापलं आहे.
