BJP : सहा वर्षात चार राज्य सरकारे पाडली, पण बिहारमध्ये दुसऱ्यांदा सरकार गमावलं; भाजपच्या राजकारणाची चर्चा तर होणारच!

| Updated on: Aug 10, 2022 | 2:45 PM

BJP : 19 जून रोजी नितीश कुमार यांनी विधानसभेत बहुमत जिंकले. त्यासाटी जेडीयूला काँग्रेसच्या चार आमदारांनी मतदान केलं. त्याशिवाय चार अपक्ष आणि सीपीआयच्या एका आमदारानेही नितीश कुमार यांना पाठिंबा दिला.

BJP : सहा वर्षात चार राज्य सरकारे पाडली, पण बिहारमध्ये दुसऱ्यांदा सरकार गमावलं; भाजपच्या राजकारणाची चर्चा तर होणारच!
सहा वर्षात चार राज्य सरकारे पाडली, पण बिहारमध्ये दुसऱ्यांदा सरकार गमावलं; भाजपच्या राजकारणाची चर्चा तर होणारच!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: विरोधकांचे सरकार पाडण्यात तरबेज असलेल्या भाजपला (bjp) बिहारमध्ये तोंडावर आपटावं लागलं आहे. गेल्या नऊ वर्षात दुसऱ्यांदा भाजपला बिहारमध्ये (bihar) आपलंच सरकार वाचवता आलं नाही. विशेष म्हणजे दोन्ही वेळा त्यांना जेडीयू नेते नितीश कुमार यांनी चितपट केलं आहे. थोडक्यात दोन्ही वेळा नितीश कुमार (Nitish Kumar) हे भाजपच्या सर्व चाणक्यांना भारी पडले आहेत. यापूर्वी 16 जून 2013मध्ये नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली होती. तब्बल 17 वर्षाची युती नितीश कुमार यांनी तोडली होती. भाजपने 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. त्याला नितीश कुमार यांनी आक्षेप घेत युती तोडून महाआघाडी तयार केली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी भाजपला झटका देत आरजेडीसोबत आघाडी केली आहे.

गेल्या सहा वर्षात भाजपने सात राज्यात मिशन लोटस राबवलं. त्यामुळे भाजपला चार राज्यात विरोधकांची सत्ता उलटवून स्वत:चं सरकार बनवता आलं आहे. मात्र, बिहारमध्ये एकदा नव्हे दोनदा नितीश कुमारांकडून भाजपला झटका का खावा लागला? गेल्या 9 वर्षात दुसऱ्यांदा असं का घडलं? याचाच घेतलेला हा आढावा.

हे सुद्धा वाचा

काय काय झालं?

  1. जून 2013मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष बनवले. तसेच मोदींच्या नेतृत्वातच भाजप लोकसभा निडवणूक लढवणार असल्याची घोषणा बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केली होती. मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केल्याने नितीश कुमार नाराज झाले होते. मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा केल्यास आम्ही भाजपसोबतची युती तोडू असं नितीश कुमार यांनी आधीच जाहीर केलं होतं. राजकीय जाणकारांच्या मते, नितीश कुमार यांना आपली धर्मनिरपेक्ष ही प्रतिमा जपायची होती.
  2. त्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपच्या कोट्यातील दोन मंत्र्यांना भेटायला बोलावलं. या दोन्ही मंत्र्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यात एक नेता उपमुख्यमंत्री होते. तसेच बिहारमधील एनडीएचे संजोजक नंद किशोर यादव होते. त्यामुळे नितीश कुमार अधिकच संतापले आणि तिथूनच दोन्ही पक्षातील वादाला फोडणी मिळाली.
  3. मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आल्याने त्यानुषंगाने नितीश कुमार यांना या दोन्ही मंत्र्यांशी चर्चा करायची होती. पण या दोन्ही मंत्र्यांनी नितीश कुमार यांना मेसेज पाठवून तुम्हाला पक्षाच्या वरिष्ठांशीच बोलावं लागेल, असं सांगितलं. त्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी मंत्रालयात जाणं बंद करून काम करणं बंद केलं.
  4. त्यामुळे नितीश कुमार यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना बडतर्फ केलं. नंतर 16 जून रोजी युतीतून बाहेर पडले. त्यावेळी 243 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत जेडीयूचे 118 आमदार होते. सरकार चालवण्यासाठी 122 आमदारांचं बहुमत आवश्यक होतं. भाजपकडे 91 आमदार होते. तर नितीश कुमार यांना सरकार वाचवण्यासाठी अवघ्या चार आमदारांची गरज होती.
  5. 19 जून रोजी नितीश कुमार यांनी विधानसभेत बहुमत जिंकले. त्यासाटी जेडीयूला काँग्रेसच्या चार आमदारांनी मतदान केलं. त्याशिवाय चार अपक्ष आणि सीपीआयच्या एका आमदारानेही नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. त्यामुळे नितीश कुमार यांचं सरकार तरलं. लालू प्रसाद यादव यांच्याकडे त्यावेळी 22 आमदार होते.

सरकार कुठे कुठे पाडलं

महाराष्ट्र: भाजपने महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं. एकनाथ शिंदे यांच्याशी हात मिळवणी करून राज्यात नवं सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून 40 आमदार फोडण्यात यश आलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं होतं.
मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातही भाजपने काँग्रेसचं सरकार पाडलं. काँग्रेसचे असंतुष्ट नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपमध्ये आणण्यात भाजप यशस्वी झाली. त्यामुळे कमलनाथ यांचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर भाजपने नरोत्तम मिश्रा यांच्या हातात राज्याची सूत्रे सोपवली.

राजस्थान: मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने सचिन पायलट नाराज होते. त्यामुळे पायलट यांच्या माध्यामातून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव होता. याची कुणकुण लागल्यानंतर अशोक गेहलोत सावध झाले. त्यांनी आपल्या समर्थ आमदारांना एका हॉटेलात टेवले. त्यानंतर प्रियंका गांधी यांची मध्यस्थी करून सचिन पायलट यांची नाराजी दूर केली. त्यामुळे गेहलोत सरकार पाडण्याचा भाजपचा प्लान फोल ठरला.

कर्नाटक: कर्नाटकात भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार पाडलं. भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांचं बंड घडवून आणलं. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. काँग्रेसच्या 12 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी बंड केलं होतं. या आमदारांनी राजीनामा देऊन भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यामुळे अल्पमतातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं.

गोवा: गोव्यात 2017च्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. भाजपला लोकांचा कौल नव्हता. पण भाजपने इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन सर्वात आधी सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्ता स्थापनेचा दावा करण्यात काँग्रेस अयशस्वी ठरली आणि त्यामुळे काँग्रेसचं सरकार येऊ शकलं नाही.

अरुणाचल प्रदेश: अरुणाचल प्रदेशात भाजपने काँग्रेसचे दोन तृतियांश आमदार फोडले. 16 सप्टेंबर 2016मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि 42 आमदारांनी पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पीपीएने भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केलं.

उत्तराखंड: उत्तराखंडमध्येही काँग्रेसचे नाराज नेते विजय बहुगुणा यांना आपल्याकडे वळवून काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपचा डाव होता. पण त्यात भाजपला यश आलं नाही. हरीश रावत सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केल्याने भाजपला काहीच करता आलं नाही.