भाजपनं आमच्या वाट्याची अर्धा एकर घेतली, त्याबदल्यात पाच एकर घेऊ : महादेव जानकर
बारामती, पुणे: रासपचा खरा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस हाच आहे. भाजप आमचा थोरला भाऊ आहे. आता वाटणीत भाजपाने आमची अर्धा एकर जमीन घेतली. पण आता आपण पाच एकर जमीन घेतलेली सुद्धा त्यांना कळू देणार नाही, असं सूचक वक्तव्य करत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत रासपला डावलल्याबाबत प्रतिक्रिया दिली. बारामतीत कांचन कुल या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक […]
बारामती, पुणे: रासपचा खरा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेस हाच आहे. भाजप आमचा थोरला भाऊ आहे. आता वाटणीत भाजपाने आमची अर्धा एकर जमीन घेतली. पण आता आपण पाच एकर जमीन घेतलेली सुद्धा त्यांना कळू देणार नाही, असं सूचक वक्तव्य करत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत रासपला डावलल्याबाबत प्रतिक्रिया दिली. बारामतीत कांचन कुल या भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्या तरी राहुल कुल भविष्यातही राष्ट्रीय समाज पक्षातच राहतील, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बारामतीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची बैठक घेत, महायुतीच्या उमेदवाराच्या खंबीरपणे पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी हा आपला सर्वात पहिला शत्रू आहे. भाजप हा थोरला भाऊ आहे. थोरल्या भावानं आपल्या वाट्याची अर्धा एकर जमीन घेतली. मात्र आपण आता त्यांची पाचएकर जमीन घेतलेलीही कळू देणार नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
माझ्याकडे बारामती आणि माढ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघात महायुतीसाठी झोकून देवून काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाने अखेरच्या टप्प्यात माझ्यासाठी माढ्याची जागा सोडली होती. परंतु ऐनवेळी मिळालेली जागा नको, ही भूमिका मी घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोठे पक्ष लहान पक्षांची गळचेपी करत असतात ते आपल्याला ज्ञात आहे. मात्र तरीही आपण युती केली आहे. आपल्यावर भाजपकडून लोकसभा निवडणुकीत नक्कीच अन्याय झाला. परंतु आपण सामंजस्याची भूमिका घेतल्याचंही जानकर यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे मोदींविरोधात सभा घेत आहेत. मात्र याचा काही परिणाम होणार नाही. उलट महायुतीच्या मतांमध्ये वाढ होईल असंही जानकर यांनी म्हटलंय. राहुल कुल हे यापुढेही रासपमध्येच राहतील.. त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपकडून काही घडलं तर आपण त्यावेळी बघू असंही जानकर म्हणाले.. आपली अडचण करायला गेले, तर त्यांची अडचण करु असंही त्यांनी याबाबत सांगितलं.