साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव; मुश्रीफांची टीका

| Updated on: Nov 03, 2020 | 1:15 PM

चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिला, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

साधाभोळा स्वभाव आणि विरोधकांचा काटा काढायचा, चंद्रकांतदादांचे दोन स्वभाव; मुश्रीफांची टीका
Follow us on

कोल्हापूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil ) हे लोकांना भरपूर मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढायचा, अशी टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाटील यांच्यावर टीका केली. (Hasan Mushrif slams chandrakant patil)

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रकांतदादांनी मला खूप त्रास दिला. सत्तेत असताना त्यांनी माझ्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. ईडीच्या धाडी टाकल्या. कोल्हापूर जिल्हा बँकप्रकरणीही त्रास दिला. ते लोकांना मदत करतात. त्यांचे दोन स्वभाव आहेत. एक साधाभोळा स्वभाव आणि दुसरा म्हणजे विरोधकांचा काटा काढण्याचा, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

आमदाराच नाही तर पोटनिवडणूक कशी होणार?

पोटनिवडणुका लावा. कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही. कोल्हापुरातील दहा आमदारांपैकी दोन आमदार राष्ट्रवादीचे आहेत. चार काँग्रेसचे आहेत. काही शिवसेनेचे आहेत आणि तीन अपक्ष आमदार आहेत. त्यांच्यासाठी कोण राजीनामा देईन? कशासाठी देईन? भाजपचा एकही आमदार नसल्याने पोटनिवडणुका कशा होतील? असे सवाल करतानाच जी गोष्ट होणारच नाही, त्यावर चंद्रकांतदादा कशासाठी बोलत आहेत?, असा खोचक सवालही त्यांनी केला.

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. “माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं”, असं मुश्रीफ म्हणाले होते.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचा हा दावा फेटाळून लावला होता. हसन मुश्रीफ यांचे आरोप हास्यास्पद आहेत. हा राज्यपालांचा अवमान करण्याचा प्रकार असून लोकशाहीला घातक आहे. विनय कोरे यांच्या आईचं निधन झालंय. मी त्याठिकाणी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्त्वनासाठी गेलो होतो. अशाठिकाणी मी कसं असं बोलेन?” असं पाटील म्हणाले होते.

तसेच, चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असं ते म्हणाले होते. (Hasan Mushrif slams chandrakant patil)

संबंधित बातम्या:

चंद्रकांतदादांना हिमालयात जावं लागणार नाही; मुश्रीफ यांची टोलेबाजी सुरूच

कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले

राज्यपाल नियुक्त आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट

(Hasan Mushrif slams chandrakant patil)