Manoj Jarange: जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केली; मराठा सामाजातूनच आरोप, असं काय घडलं?
Manoj Jarange: मराठ आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी मोठा आरोप केला आहे. जरांगेंमी मराठी समाजाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात आता स्पष्ट फूट दिसू लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या चालू आंदोलनाला मराठा क्रांती ठोक मोर्चाचा पाठिंबा नाही. उलट त्यांच्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी स्पष्ट केले की, ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांचा मोर्चा राज्यभर आंदोलन उभारणार आहे.
काय म्हणाले सुनील नागणे?
नागणे यांनी म्हटले की, २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण, नंतर देवेंद्र फडणवीस आणि आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचे काम करत आहेत. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी पुढील काळात जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेत आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आठवा दिवस
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. पहिले पाच दिवस तर त्यांनी पाणीही न पिता उपोषण केलं, त्यानंतर अखेर सरकारकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली आहेत, मात्र अजूनही त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाहीये. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी न झाल्याने उपोषण सुरूच आहे. मात्र शिष्टमंडळाच्या आवाहनानंतर जरांगे पाणी पिण्यास आणि सलाईन घेण्यास राजी झाले आहेत. तरीही सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे. शिष्टमंडळाने एक ते दोन दिवसांत मागण्यांबाबत निर्णय कळवण्याची भूमिका घेतली आहे, तर जरांगे १२ तारखेला मुंबईला येण्यावर ठाम आहेत.
११ तारखेपर्यंत मागण्या मान्य करा – जरांगे यांचा अल्टिमेटम
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. ११ तारखेपर्यंत सर्व मागण्या मान्य करा. मागण्या मान्य झाल्यास ११ तारखेला मुंबईत गुलाल घेऊन येऊ आणि १२ तारखेच्या बैठकीत पुढचा निर्णय घेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
