अखेर मनसेच्या निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब, जागाही ठरल्या

| Updated on: Sep 20, 2019 | 9:32 PM

राज्यातील 288 पैकी 100 जागा लढणार असल्याचं मनसेच्या नेत्यांनी (MNS Vidhansabha election) सांगितलंय. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी चौकशीनंतर विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नेमकं कुठल्या मुद्द्यावर विरोधक लक्ष्य करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अखेर मनसेच्या निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब, जागाही ठरल्या
Follow us on

मुंबई : मनसेचंही अखेर विधानसभा निवडणूक (MNS Vidhansabha election) लढण्याचं निश्चित झालंय. ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे निवडणूक लढणार की नाही याबाबत साशंकता होती. राज्यातील 288 पैकी 100 जागा लढणार असल्याचं मनसेच्या नेत्यांनी (MNS Vidhansabha election) सांगितलंय. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी चौकशीनंतर विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नेमकं कुठल्या मुद्द्यावर विरोधक लक्ष्य करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसेची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोअर कमिटीची बैठक मनसेच्या दादर इथल्या राजगड कार्यालयात पार पडली. या कोअर कमिटीत मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई आणि अमित ठाकरे हे मनसेच्या पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. या बैठकीत मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेण्यात आल्याचं मनसेच्या नेत्यांनी सांगितलं आहे.

राज्यातील 100 जागा लढणार

मनसेने या आढावा बैठकीत 100 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचं ठरवलं आहे. मुंबई, ठाणे, कोकण, नाशिक, मराठवाडा, परभणी येथील जागांची चाचपणी या आधीच राज ठाकरे यांनी केली होती. कल्याण, डोंबिवली या मतदारसंघात मनसेचे इच्छुक उमेदवार अधिक आहेत. तसेच या भागात मनसेचे वर्चस्व आहे. मात्र नेमक्या किती जागा कुठे लढवणार याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाहीर करतील, असं खुद्द बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

“मनसे आघाडीसोबत जाणार नाही”

विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनसे जाईल, अशी चर्चा होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा प्रचाराचा जो झंझावात होता, तो झंझावात आता राज ठाकरे स्वतःच्या पक्षासाठी करताना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.