अजित पवार भाजपसोबत का गेले?; अमोल कोल्हे यांनी बंडाची इनसाईड स्टोरी सांगितली

| Updated on: Jul 17, 2023 | 11:16 AM

Amol Kolhe on Why did Ajit Pawar go with BJP : अमोल कोल्हे यांनी इतिहासाचा दाखला दिला, 'त्या' पुस्तकाचा संदर्भ सांगितला; वाचा अजित पवार यांच्या बंडाची इनसाईड स्टोरी

अजित पवार भाजपसोबत का गेले?; अमोल कोल्हे यांनी बंडाची इनसाईड स्टोरी सांगितली
Follow us on

मुंबई | 17 जुलै 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण हे सगळं एका दिवसात झालं का? असा प्रश्न सर्वसामन्यांना पडला. पण या शपथविधीआधीपासूनच अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. अशा सगळ्यात अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला? त्यांच्या बंडामागची इनसाईड स्टोरी काय? अजित पवार यांना सोबत घेण्यामागे भाजपची भूमिका काय? या सगळ्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाष्य केलं आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याबाबतच्या सविस्तर व्हीडिओ शेअर केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात हा मोठा राजकीय भूकंप घडण्यामागे सगळ्यात मोठं कारणं आहे ते 2024 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीत भाजपला धोक्याची घंटा जाणवतेय. त्यासाठी इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. इथून मागचा भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर कोणत्याही पक्षाला या देशात दोन टर्महून अधिक काळ लोकांनी निवडून दिलेलं नाही. त्यामुळे हा इतिहास पाहता भाजपला धोक्याची घंटा जाणवतेय. त्यामुळे त्यांनी इतर पक्षांना सोबत घेण्याचं ठरवलं आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत. मागच्या दहा वर्षांत लोकांमध्ये मोदी सरकारबद्दल अँन्टी इनकंबन्सी निर्माण झाली आहे, असंही ते म्हणाले.

The New BJP या पुस्तकाचा अमोल कोल्हे यांनी दाखला दिला. ते म्हणाले, या पुस्तकात भाजपचा सध्याचा राजकीय ग्राफ दिसतो. 2019 च्या निवडणुकांमध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. हिंदी हार्ट लँडमध्ये ती अधिक आहे. देशातील 14 राज्यांमध्ये सध्या भाजपचं सरकार सत्तेत नाही. त्यामुळे धोक्याची घंटा त्यांनी लक्षात घेत इतर पक्षांना सोबत घेतलं आहे, असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

हा सगळा राजकीय आलेख पाहिल्यानंतर महत्वाचं ठरतं ते महाराष्ट्र राज्य. इथं लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यात भाजप दावा करतंय की, महाराष्ट्रात 45 जागा निवडून आणणार त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत फुट पाडली. आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीत हा भूकंप घडवण्यात आला, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे.

शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही सर्व्हे समोर आले. त्यात महाविकास आघाडीचं पारडं जड दिसलं. त्यामुळे हा भुकंप घडवण्यात आला. काहीही करा पण देशात पुन्हा सरकार आणा… साम-दाम-दंड-भेद हीच आहे ट्रीपल इंजिन सरकारची इनसाइड स्टोरी!, असं अमोल कोल्हे यांनी या व्हीडिओत सांगितलं आहे.